नुकत्याच झालेल्या ऑस्ट्रेलिया ‘अ’विरुद्धच्या दुसऱ्या सराव सामन्यात केलेल्या शतकामुळे माझा आत्मविश्वास वाढल्याचे भारताचा यष्टीरक्षक-फलंदाज रिषभ पंत म्हणाला. पंतला मागील काही काळात चांगली कामगिरी करण्यात अपयश आले आहे. यंदा युएईमध्ये झालेल्या आयपीएल स्पर्धेतही त्याला फारशा धावा करता आल्या नाहीत आणि त्याच्या फिटनेसवरही प्रश्न उपस्थित झाले. मात्र, दुसऱ्या सराव सामन्याच्या दुसऱ्या डावात पंतने अप्रतिम फलंदाजी केली. त्याने ७३ चेंडूतच ९ चौकार आणि ६ षटकारांच्या मदतीने नाबाद १०३ धावांची खेळी केली. ही खेळी माझ्यासाठी खूप महत्त्वाची होती, असे पंत म्हणाला.
दुसऱ्या डावात मी फलंदाजीला उतरलो, तेव्हा बरीच षटके शिल्लक होती. त्यामुळे (हनुमा) विहारी आणि मी संयमाने खेळत मोठी भागीदारी रचण्याचा प्रयत्न केला. माझा खेळपट्टीवर जास्तीतजास्त वेळ घालवण्याचा प्रयत्न होता. त्यामुळे हळूहळू माझा आत्मविश्वास वाढला. माझ्यासाठी हे शतक फार महत्त्वाचे होते. मी एका महिन्यापासून ऑस्ट्रेलियात आहे. मात्र, मानेच्या दुखापतीमुळे मला पहिल्या सराव सामन्यात खेळता आले नाही. दुसऱ्या सामन्याच्या पहिल्या डावात मी पायचीत झालो, पण पंचांचा निर्णय चुकीचा होता. त्यामुळे दुसऱ्या डावात मला जास्तीतजास्त वेळ खेळपट्टीवर घालवायचा होता. याचा मला फायदा झाला आणि मी मोठी खेळी करू शकलो, असे पंतने सांगितले.
💯
A cracking first-class century from @RishabhPant17 in just 73 balls at the SCG. He smashes 22 off the final over to bring up his 100.
9×4 6×6. BOOM. pic.twitter.com/Mg3M1WBYlg
— BCCI (@BCCI) December 12, 2020