क्रिकेट विश्वचषकात अनेक संघात सहभागी झालेले खेळाडू आयुष्याचे अनेक खडतर टप्पे पार करून आलेले असतात. करियरची सुरुवात ते विश्वचषकापर्यंतचा त्यांचा प्रवास हा अनेक आव्हानांनी भरलेला असतो. त्यात वेस्ट इंडिज क्रिकेट बघितले तर अनेक गुणवान खेळाडू असूनदेखील त्यांनादेखील अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. त्यापैकी एक खेळाडू म्हणजे वेस्ट इंडिजच्या विश्वचषक संघात निवड झालेला ओशाने थॉमस.
आयुष्यात नेमके काय, कधी, कसे घडेल हे सांगता येत नाही. ओशानेच्या बाबतीतही असाच एक प्रसंग घडला. हा प्रसंग त्याच्या आयुष्यातील सर्वात वाईट प्रसंग होता. वेस्ट इंडिजमधील काही ठिकाणी राजरोसपणे गुन्हे घडत असल्याचे पहायला मिळते. थॉमस जेव्हा अकरा वर्षांचा होता तेव्हा त्याच्या डोळ्यांदेखत मोठ्या भावाला गोळी घातली गेली होती. ओशाने आणि त्याच्या भावाचे खास नाते होते. ते दोघे कुठेही एकत्रच जायचे. त्यामुळे जेव्हा आपल्या मोठ्या भावाला गोळी लागली तेव्हा नेमके काय करायचे हे ओशानेला समजले नाही. या प्रकरणात ओशानेच्या मोठ्या भावाचा मृत्यू झाला. त्यानंतरही दुर्दैवाने त्याची पाठ सोडली नाही. ओशाने जेव्हा 20 वर्षांचा झाला तेव्हा तो जमैकाची राजधानी किंग्स्टन येथे गेला.
किंग्स्टनध्येही ओशानेला वाईट अनुभव आले. ओशाने मार्केटमध्ये जाण्यासाठी घरून निघाला. रस्त्यात एका एटीएमजवळ उभ्या असलेल्या तीन जणांनी ओशानेला लुटले. यावेळी चोरांना ओशानेकडील पैसे, सोन्याची चेन आणि घड्याळ या गोष्टी लंपास केल्या. या सर्व गोष्टींनंतरही ओशानेने हार मानली नाही. त्याने प्रामाणिकपणे मेहनत करत वेस्ट इंडिजच्या संघात स्थान पटकावले आणि आता गुणवत्तेच्या जोरावर विश्वचषकाच्या संघात स्थान मिळवले आहे.