स्टम्प माइकमुळे युवा यष्टीरक्षक रिषभ पंत चर्चेचा विषय ठरणे हे काही नवे नाही. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेत त्याच्यात आणि टीम पेन यांच्यात झालेली वादावादी चांगलीच गाजली होती. आता पुन्हा एकदा तो चर्चेचा विषय ठरत आहे. शनिवारी आयपीएलमध्ये दिल्ली कॅपिटल्स आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात सामना झाला.
या सामन्यात कोलकाता प्रथम फलंदाजी करत होता. दिल्लीचा संदीप लामिच्छाने टाकत असलेल्या चौथ्या षटकात रिषभ पंतने यष्टींमागून क्षेत्ररक्षणात बदल करत असताना, ये तो वैसे भी चौका है (यापुढचा चेंडू तर चौकारच जाणार आहे) असे वक्तव्य केल्याचे आढळले. त्यामुळे हा सामना फिक्स आहे का, असा सवाल सोशल मीडियावरून विचारला जात होता. मात्र, हा सामना फिक्स नव्हता, असे बीसीसीआयने स्पष्ट केले आहे.
रिषभ पंत नक्की काय म्हणाला हे कोणीही ऐकले नाही आहे. कदाचित तो कर्णधार श्रेयस अय्यरला ऑफला चौकार जाऊ नये, याकरता क्षेत्ररक्षक वाढवण्यासाठीही सांगत असेल. एखादा युवा खेळाडू काहीतरी म्हणाला याचा असा अयोग्यपणे वापर करणे आणि एखाद्या व्हिडीओची सत्यता न पडताळता याला फिक्सींगचे स्वरुप देणे हे खूपच चुकीचे आहे, असे बीसीसीआयचा एक अधिकारी म्हणाला.