भारताचा सर्वात यशस्वी कर्णधार महेंद्रसिंग धोनीचा आज (७ जुलै) ४० वा वाढदिवस आहे. धोनीने मागील वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती स्वीकारली होती. धोनी भारतीय क्रिकेटच्या इतिहासातील सर्वोत्कृष्ट यष्टीरक्षक-फलंदाज मानला जातो. तसेच त्याच्या नेतृत्वात भारताने २००७ मध्ये टी-२० आणि २०११ मध्ये एकदिवसीय वर्ल्डकप जिंकला होता. २०११ एकदिवसीय वर्ल्डकपचा अंतिम सामना धोनीसाठी कर्णधार आणि फलंदाज म्हणून खूप खास ठरला होता. त्याच्या नाबाद ९१ धावांच्या खेळीच्या जोरावर भारताने अंतिम सामना जिंकला होता. भारताला जिंकण्यासाठी चार धावांची आवश्यकता असताना धोनीने षटकार मारला होता आणि त्याचा हा षटकार कोणताही भारतीय चाहता आजही विसरू शकलेला नाही. भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुलीसुद्धा धोनीच्या त्या षटकाराचा चाहता आहे.
तो खूपच मोठा क्षण होता
२०११ मध्ये भारताने एकदिवसीय वर्ल्डकप जिंकला होता आणि माझ्या मते तो भारतीय क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात मोठा दिवस होता. महान महेंद्रसिंग धोनी…त्याचा तो फटका, अखेरच्या चेंडूवर त्याने मारलेल्या षटकाराची भारतीय क्रिकेटच्या इतिहासात कायम नोंद राहील. तो खूपच मोठा क्षण होता, असे म्हणत गांगुलीने धोनीचे कौतुक केले होते.
धोनीसाठी आनंद झाला होता
मी अंतिम सामना पाहण्यासाठी वानखेडे स्टेडियममध्ये उपस्थित होतो आणि धोनीला पाहण्यासाठी मी कॉमेंट्री बॉक्सच्या बाहेर आलो होतो. भारताने सामना जिंकल्यावर खेळाडूंनी मैदानाची फेरी मारत चाहत्यांसोबत जल्लोष केला होता. २००३ मध्ये आम्हाला ऑस्ट्रेलियाने अंतिम सामन्यात पराभूत केले होते आणि त्यावेळी मी भारताचा कर्णधार होतो. मला वर्ल्डकप हातात धरण्याची संधी मिळाली नव्हती. परंतु, ती संधी धोनीला मिळाल्याचा मला खूप आनंद होता, असेही गांगुलीने एका मुलाखतीत सांगितले होते.