ऑस्ट्रेलियाविरुद्ध सिडनी येथे झालेली तिसरी कसोटी भारताने अनपेक्षितरित्या अनिर्णित राखली. ऑस्ट्रेलियाने सामना जिंकण्यासाठी भारतासमोर ४०७ धावांचे आव्हान ठेवले होते. याचा पाठलाग करताना भारताने चौथ्या दिवसअखेर दोन विकेट गमावल्या होत्या. तर पाचव्या दिवशी दुसऱ्याच षटकात कर्णधार अजिंक्य रहाणे बाद झाला. मात्र, चेतेश्वर पुजारा, रिषभ पंत, हनुमा विहारी आणि अश्विनच्या झुंजार खेळींमुळे भारताने हा सामना अनिर्णित राखला. भारताच्या सर्व खेळाडूंची कामगिरी कौतुकास्पद होती, असे मत भारताचे माजी कर्णधार दिलीप वेंगसरकर यांनी व्यक्त केले. तसेच त्यांनी ११८ चेंडूत ९७ धावांची खेळी करणाऱ्या पंतचे विशेष कौतुक केले.
Rishabh Pant brings up his half-century!
Four fours and three sixes in his innings so far…#AUSvIND pic.twitter.com/4qO06BGzHC
— ICC (@ICC) January 11, 2021
भारताची कामगिरी फारच उत्कृष्ट होती. चौथ्या दिवशी दोन विकेट गमावल्यानंतर भारतीय संघ हा सामना वाचवू शकेल असे कोणालाही वाटले नव्हते. मी भारताच्या या यशाचे श्रेय रिषभ पंतला देईन. त्याने अप्रतिम खेळी केली. त्याच्या खेळीमुळे भारताला सामना जिंकण्याची संधी निर्माण झाली होती. तो आणखी काळ खेळपट्टीवर टिकला असता, तर भारताला विजय मिळवण्यात यश आले असते, याची मला खात्री आहे. मात्र, हा सामना अनिर्णित राखणे हे विजयापेक्षा कमी नव्हते. अश्विन आणि विहारी यांनीही अप्रतिम खेळ केला. हे यश संपूर्ण संघाचे होते, असे वेंगसरकर यांनी एका मुलाखतीत सांगितले.