विकास, गोल्फादेवी, एस.एस.जी, विजय यांनी श्री सिद्धेश्वर सेवा मंडळ आयोजित मनसे चषक ज्युनियर कबड्डी स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे. प्रभादेवी येथे सुरु असलेल्या या स्पर्धेच्या दुसर्या दिवशी प्रभादेवीच्या विकासाने लालबागच्या महाराष्ट्र स्पोर्ट्सचा ५०-१० असा धुव्वा उडवला. अवधूत शिंदेच्या दमदार चढाया त्याला सिद्धेश चव्हाणच्या भक्कम पकडीची साथ यामुळे पहिल्या डावात त्यांच्याकडे २०-०३ अशी भक्कम आघाडी होती.
वरळी कोळीवाड्यातील गोल्फादेवीने जय भारतचे कडवे आव्हान ६३-४१ असे संपुष्टात आणले. पहिली १० मिनिटे हा सामना चुरशीचा झाला. मात्र त्यानंतर गोल्फादेवीने वर्चस्व राखले. गोल्फादेवीकडून सिद्धेश पिंगळे, विष्णू लाड यांनी, तर राज आचार्य, निखिल पाटिल यांनी जय भारतकडून उत्कृष्ट खेळ केला. एस.एस.जी या संघाने वीर संताजीचा प्रतिकार ५२-३७ असा मोडून काढला. विश्रांतीपर्यंत २४-१२ अशी आघाडी घेणार्या एस.एस.जीला उत्तरार्धात मात्र वीर संताजीने कडवी लढत दिली, पण ती त्यांना विजय मिळवून देण्यासाठी पुरेशी नव्हती.
तसेच दोन दादरच्या संघांमधील सामन्यात विजयने अमरला ३८-१७ असे नमवत आगेकूच केली. असे असले तरी अमरच्या खेळाडूंनीही आपली छाप पाडली. अमरचे सर्वच खेळाडू ८ ते १४ वर्षांच्या आतील होते. या सामन्याच्या मध्यांतरापर्यंत अमरने विजयला कडवी लढत दिली. त्यावेळी गुणफलक २०-१४ असा विजयच्या बाजूने होता. सूरज साळुंखे, अभिषेक रुपनर विजयकडून, तर साहिल कुडव, साहिल रीकामे अमरकडून उत्तम खेळले.