नवी दिल्ली : टी-20 संघाचे कर्णधारपद सोडल्यानंतर विराट कोहलीने म्हटले होते की, मला एकदिवसीय संघाच्या कर्णधारपदावरून हटवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मी निवडकर्त्यांचा निर्णय मान्य केला आहे. तसेच कर्णधारपदाचा वाद वाढत असल्याचे पाहून विराट कोहलीने दक्षिण आफ्रिका दौऱ्यानंतर कसोटी कर्णधारपद सोडण्याचा निर्णय घेतला होता. याचपार्श्वभूमीवर आता बीसीसीआयचे माजी अध्यक्ष सौरव गांगुली यांनी विराट कोहलीच्या ‘कर्णधार’ वादावर पुन्हा एकदा स्पष्टीकरण दिले आहे. विराट कोहलीला कर्णधारपदावरून हटवले नसल्याचे सौरव गांगुलीने सांगितले आहे.
2021 च्या टी-20 विश्वचषकानंतर विराट कोहलीने क्रिकेटच्या सर्वात लहान स्वरूपाच्या कर्णधारपदावरून पायउतार होण्याचा निर्णय घेतला होता. एकदिवसीय आणि कसोटीत संघाचे नेतृत्व करण्याची इच्छा त्याने व्यक्त केली असली तरी, त्याच्या निर्णयावर बीसीसीआय खूश नव्हती. गांगुलीने सांगितले की, त्यांनी विराटला टी-20 नंतर एकदिवसीयचे कर्णधारपद सोडण्यास सांगितले होते. पांढऱ्या चेंडूच्या क्रिकेटमध्ये दोन कर्णधार नसावे. टी-२० आणि एकदिवसीय क्रिकेटसाठी एकच कर्णधार असावा, अशी माझी इच्छा होती, असे गांगुलीने म्हटले आहे.
रिअॅलिटी शो दादागिरी अनलिमिटेड सीझन 10 च्या कार्यक्रमात बोलताना सौरव गांगुली म्हणाले की, ‘मी विराटला कर्णधारपदावरून हटवले नाही. हे मी अनेकदा सांगितले आहे. त्याला टी-20 चे नेतृत्व करण्यात स्वारस्य नव्हते, त्यामुळे जेव्हा त्याने हा निर्णय घेतला तेव्हा मी त्याला सांगितले की, जर तुला टी-20 मध्ये नेतृत्व करण्यात रस नसेल तर तू एकदिवसीय क्रिकेटच्या कर्णधारपदावरूनही पायउतार झालात तर बरे होईल. भारतीय क्रिकेटसाठी एकदिवसीय व टी-20 साठी वेगळा कर्णधार आणि कसोटी क्रिकेटसाठी वेगळा कर्णधार असू दे, असे सौरव गांगुली म्हणाले.
हेही वाचा – महायुतीचे ‘मिशन 2024’ : विभागीय संपर्क नेते, लोकसभा निरीक्षकाची यादी जाहीर
दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर जाण्यापूर्वी विराट कोहलीच्या एका वक्तव्याने खळबळ उडाली होती. कर्णधारपदाच्या वादावर पत्रकार परिषदेत बोलताना विराट कोहली म्हणाला होता की, जेव्हा दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी कसोटी संघाची निवड केली जात होती, तेव्हा मला बैठकीला बोलावण्यात आले होते. कसोटी संघाबाबत निवडकर्त्यांशी चर्चा झाली होती, पण बैठकीअंती त्यांनी सांगितले की, मला एकदिवसीय संघाच्या कर्णधारपदावरून हटवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मी निवडकर्त्यांचा निर्णय मान्य केला आहे. मात्र विराट कोहलीच्या या वक्तव्यावरही सौरव गांगुली यांनी स्पष्टीकरण दिले आहे. ते म्हणाले की, विराट कोहलीशी बोलल्यानंतरच त्याला एकदिवसीय कर्णधारपदावरून हटवण्यात आले होते.