कालवा फुटला तर उंदीर जबाबदार, धरण फुटलं तर खेकडे जबाबदार! मग मंत्रीपद का घेतलं? असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अजित पवार यांनी केला आहे. तिवरे धरण दुर्घटनेवर जलसंधारण मंत्री तानाजी सावंत यांनी दिलेल्या स्पष्टीकरणावर अजित पवार यांनी ट्विटरवर आपली प्रतिक्रिया दिली आहे. सरकारच्या निष्क्रियतेचं खापर हे नेतेमंडळी प्राण्यांवर फोडत असल्याचे अजित पवार म्हणाले आहेत.
कालवा फुटला तर उंदीर जबाबदार,धरण फुटलं तर खेकडे जबाबदार! मग मंत्रीपद का घेतलं?भाजपा-सेनेचे मंत्री स्वतःचं अपयश केव्हा मान्य करणार?लोकांच्या तक्रारींकडे दुर्लक्ष करून जीवाशी खेळणारे हे, सरकारच्या निष्क्रियतेचं खापर प्राण्यांवर फोडतायत! https://t.co/EPlU4AaNdb
— Ajit Pawar (@AjitPawarSpeaks) July 5, 2019
रत्नागिरी जिल्ह्यातील तिवरे धरण फुटण्यामागे खेकडे जबाबदार असल्याचे जलसंधारण मंत्री तानाजी सावंत म्हणाले आहेत. खेकड्यांमुळे धरणाला भगदाड पडून धरण फुटले, असा दावा त्यांनी केला. त्यांच्या या दाव्यावरुन राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी तानाजी सावंत यांच्यावर टीका केली. त्याचबरोबर अजित पवार यांनी मंत्रीपद कशाला घेतले? असा सवाल केला आहे. हे धरण बांधण्याचे कंत्राट तेथील स्थानिक शिवसेना कंत्राटदाराकडे होते. त्यामुळे सेना आमदाराला वाचवण्यासाठी सावंत अशाप्रकारचे कारणे देत आहेत, असे नवाब मलिक म्हणाले आहेत.
जलसंधारण मंत्री तानाजी सावंत तिवरे धरण फुटल्याबद्दल खेकड्यांना जबाबदार धरतायत. त्यांच्या कंत्राटदार आमदाराला पाठीशी घालण्यासाठी हे निर्लज्ज समर्थन आहे. भ्रष्ट मोठे मासे वाचवण्यासाठी खेकड्यांचा बळी दिला जातोय. या दुर्घटनेची न्यायालयीन चौकशी झाली पाहिजे.
– @nawabmalikncp pic.twitter.com/Bru7VSl4TJ— NCP (@NCPspeaks) July 5, 2019
भ्रष्ट आणि मोठे मासे वाचवण्यासाठी खेकड्यांचा बळी घेतला जात आहे, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक म्हणाले आहेत. जलसंधारण मंत्री सेनेच्या आमदारांना वाचवण्यासाठी निर्लज्जपणे त्यांचे समर्थन करत आहेत, असे देखील नवाब मलिक म्हणाले आहेत. कंत्राटदार आणि आमदारासारख्या मोठ्या माशांना वाचवण्यासाठी जलसंधारण मंत्री खेकड्यांचा बळी घेत आहे, असे मलिक म्हणाले आहेत.
हेही वाचा – तिवरे धरणात सापडला डायनॉसॉर ‘खेकडा’? वाचा काय आहे रहस्य
हेही वाचा – तिवरे धरणापासून ३५ किमी अंतरावर सापडला तिचा मृतदेह