‘खेकड्यांनी भोक पाडल्याने तिवरे धरणाला भगदाड पडले त्यामुळेच तिवरे धरण फुटले‘, असा अजब दावा जलसंधारण मंत्री तानाजी सावंत यांनी केला आहे. तसेच तिवरे धरण फुटणे ही एक नैसर्गिक आपत्ती असून या गोष्टी कुणाच्याही हातात नसतात. ही एक मोठी दुर्घटना होती. याप्रकरणी ‘मी अधिकाऱ्यांशी आणि जुन्या जाणत्या ग्रामस्थांशी मी चर्चा केली. या चर्चेत त्यांनी सांगितल्याप्रमाणे हे धरण खेकड्यांनी पोखरल्याने फुटले‘, असावा असा दावा जलसंधारण मंत्री तानाजी सावंत यांनी केला आहे.
खेकड्यांने धरणाला पाडले भगदाड
रत्नागिरी – चिपळूण तालुक्यातील तिवरे धरण फुटले असून धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील किमान सात गावे पाण्याखाली वाहून गेली आहेत. आतापर्यंत या घटनेमध्ये २४ जण बेपत्ता झाले असून १८ जणांचे मृतदेह सापडले आहेत.सोमवारी रात्री ९.३० वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली आहे. या घटनेने परिसरात हाहाकार माजला असून किमान २४ ग्रामस्थ वाहून गेल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. सध्या एनडीआरएफकडून बचावकार्य सुरु असून बेपत्ता झालेल्यांचा शोध सुरु आहे. दरम्यान, या घटनेतील मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. अशात जलसंधारण मंत्री तानाजी सावंत यांनी एक अजब दावा केला आहे. खेकड्यांनी धरण पोखरल्याने भगडाद पडल्याचा दावा तानाजी सावंत यांनी केला आहे. तसेच ते पुढे म्हणाले की, ‘खेकड्यांनी धरणं फोडले असेल तर गुन्हा कुणावर दाखल करायचा‘? असा प्रश्व देखील त्यांनी उपस्थित केला आहे. एका मराठी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी हा अजब दावा केला आहे. या अजब दाव्यामुळे महाराष्ट्राच्या जनतेने संताप व्यक्त केला आहे.
या धरणाला गळती लागली होती. जेव्हा धरण गळू लागले तेव्हा याबाबत तक्रार देखील करण्यात आली होती. मात्र, त्याकडे दुर्लक्ष केले गेले असल्याची तक्रार ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे. मात्र, आता हे धरण खेकड्यामुळे फुटल्याचा अजब दावा केला जात आहे.
हेही वाचा – तिवरे धरणापासून ३५ किमी अंतरावर सापडला तिचा मृतदेह
हेही वाचा – तिवरे धरण दुर्घटनेतील या छायाचित्रांमुळे अंगावर येतील शहारे