मतांच्या टक्क्यात केवळ अर्धा टक्के घट झाली आहे. केवळ दहा जागा वाढविणाऱ्या पक्षाच्या विजयाविषयीच खूप मोठे केल्याचे चित्र निर्माण केले जात आहे. १९ अपक्ष आमदार आमच्या संपर्कात आहे. त्यामुळे आमचे संख्याबळ हे १२५ इतके होईल आणि मुख्यमंत्री देवेंद्रजीच होतील”, असे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पुणे येथे पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले आहे. कोथरूड विधानसभा मतदारसंघातील नगरसेवक किरण दगडे – पाटील यांच्यातर्फे पाटील आणि भीमराव तापकीर यांचा सत्कार समारंभ आयोजित केला होता. त्यावेळी पत्रकारांशी पाटील यांनी संवाद साधला. तसेच शिवसेनेच्या भुमिकेविवषयी त्यांनी थेट टीका करणे टाळले. शिवसेनेला बोलण्याचा अधिकार आहे, परंतु अंतिम निर्णय चर्चेतूनच होईल, असे पाटील म्हणाले.
“भारतीय जनता पार्टीच्या निवडून आलेल्या आमदारांची संसदीय बैठक ३० तारखेला मुंबईत होणार आहे. या बैठकीला केंद्रीय निरीक्षक म्हणून कोण येणार? हे लवकरच कळेल. या बैठकीत आमचा सभागृह नेता ठरविला जाईल. त्यांनतर शिवसेनेबरोबरची चर्चा सुरू होईल. कोणाला काय हवे? ते व्यक्त करण्याचे स्वातंत्र्य प्रत्येकाला आहे. मुख्यमंत्री पदासंदर्भात उद्धवजी आणि देवेंद्रजी हे दोघे निर्णय घेतील”, असे पाटील म्हणाले.
शिवसेना पहीली अडीच वर्ष मुख्यमंत्री पद मागत असल्याविषयी पत्रकारांनी विचारले असता, ते म्हणाले, “त्यांना काय म्हणायचे हा त्यांचा अधिकार आहे. सत्ता वाटपासंदर्भात मी काही बोलू शकत नाही. आमच्या पक्षात ज्याला जे काम दिले जाते, त्याने ती जबाबदारी पार पाडायची असते. माझ्याकडे दिलेले काम मी करीत आहे. सत्ता वाटपासंदर्भात देवेंद्रजी आणि उद्धवजी हेच निर्णय घेतील.”
जागा घटल्यामुळे मराठा मुख्यमंत्री करावा, अशी मागणी केली जात असल्याविषयी पत्रकारांनी विचारले असता पाटील म्हणाले, “महाराष्ट्राच्या गेल्या ६० वर्षाच्या इतिहासात बिगर काँग्रेसी सरकार यशस्वीपणे पाच वर्ष कारभार करणारे ठरले आहे. देवेंद्रजी हे सर्वांत चांगले मुख्यमंत्री आहे. विधानसभा निवडणुकीत भाजपने उभे केलेल्या उमेदवारांची संख्या आणि विजयी उमेदवारांची संख्या लक्षात घेता आमच्या जागा घटलेल्या नाहीत. मागील निवडणुकीच्या तुलनेत आमचा विजयी होण्याचा दर यावेळी चांगला आहे.