कल्याण-डोंबिवली महानगर पालिकेतून वगळलेल्या १८ गावांची स्वतंत्र नगरपरिषद करण्याचा निर्णय मंगळवारी झालेल्या राज्यमंत्री मंडळाच्या बैठकीत घेण्यात आला.कल्याण-डोंबिवली महानगर पालिका क्षेत्रातील २८ गावांपैकी १८ गावांसाठी स्वतंत्र नगर परिषद स्थापन करण्यात येणार असल्याचे निवेदन मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी मागील आठवड्यात विधान परिषदेत केले होते. त्यानंतर आजच्या मंत्रीमंडळाच्या बैठकीत या अठरा गावांची स्वतंत्र नगर परिषद करण्याचा निर्णय घेण्यात आला. कोकण विभागीय आयुक्तांनी दिलेल्या अभिप्रायावरुन वरीलप्रमाणे स्वतंत्र नगरपरिषदेचा निर्णय घेण्यात आला.
वगळण्यात आलेली गावे
घेसर, हेदूटणे, उंब्रोली, भाल, द्धारली, माणेरे, वसार, आशेळे, नांदिवली तर्फे अंबरनाथ, आडिवली-ढोकली, दावडी, चिंचपाडा, पिसवली, गोळीवली, माणगाव, निळजे, सोनारपाडा व कोळे.
उर्वरीत नऊ गावे
आजदे, सागाव, नांदिवली पंचानंद, धारिवली, संदप, उसरघर, काटई, भोपर व देसलेपाडा.