राज्यात कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या आज २० हजारांच्या पार गेला आहे. यामध्ये आजच्या दिवसभरात १ हजार १६५ रुग्णांची भर पडली आहे. मात्र, त्यामध्ये सर्वाधिक ७२२ रुग्ण एकट्या मुंबईत सापडले आहेत. त्यामुळे मुंबईतल्या कोरोनाबाधित रुग्णांची संख्या १२ हजार ६८९वर पोहोचली आहे. त्यामुळे मुंबईकरांच्या दृष्टीने रोज नव्या रुग्णांसोबत चिंतेमध्ये भर पडत आहे. या पार्श्वभूमीवर मुंबईचे पालिका आयुक्त म्हणून आज नव्याने पदभार स्वीकारलेले इकबाल चहल यांच्या येण्यामुळे त्यात सकारात्मक फरक पडण्याची वाट मुंबईकर पाहू लागले आहेत.
मुंबईतल्या वाढलेल्या रुग्णसंख्येसोबतच मुंबईतल्या कोरोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या देखील वाढली आहे. आज दिवसभरात मुंबईत २७ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला असून आता एकूण मृतांचा आकडा ४८९ वर पोहोचला आहे. आज मृत्यू पावलेल्या रुग्णांमध्ये ३ रूग्ण ४० वर्षांखालील, १२ रुग्ण ६० वर्षांवरील तर उरलेले १२ रुग्ण हे ४० ते ६० या वयोगटातले होते. त्याशिवाय, बऱ्या झालेल्या रुग्णांचा आकडा देखील आजच्या २०३ रुग्णांनी वाढून २ हजार ७९२वर पोहोचला आहे. त्यामुळे ही मुंबईकरांसाठी सकारात्मक आणि दिलासादायक बाब म्हणावी लागेल.