अर्थमंत्री निर्मला सीतारमण आज गुरुवारी पुन्हा पत्रकार परिषद घेणार आहेत. २० लाख कोटींच्या आर्थिक पॅकेजशी संबंधित उर्वरित तपशील त्या आज सांगणार आहेत. अर्थमंत्री आज कृषी क्षेत्र आणि त्यासंबंधित कामांविषयी मोठी घोषणा करू शकतात, अशी शक्यता वर्तवली जात आहे. यासह पुरवठा साखळी दुरुस्त करण्यासाठी मोदी सरकारकडून मोठा दिलासा मिळू शकेल.
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी आत्मनिर्भर भारत निर्माण करण्यासाठी २० लाख कोटी रुपयांचं पॅकेज जाहीर केलं. अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी बुधवारी पॅकेजच्या पहिल्या भागाचा तपशील दिला. यामध्ये छोट्या उद्योगात काम करणाऱ्यांना दिलासा मिळाला आहे. आज निर्मला सीतारमण मदत पॅकेजच्या दुसर्या भागाबद्दल माहिती देणार आहेत.
हेही वाचा – मुंबईसाठी वेगळं आर्थिक पॅकेज द्या; संजय राऊत यांची मागणी
काल एमएसएमई क्षेत्राला दिलासा मिळाला
अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी बुधवारी मदत पॅकेजच्या पहिल्या भागाची माहिती दिली. सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांशी संबंधित लोकांना दिलासा देण्याचा प्रयत्न सरकारने केला. या क्षेत्राला तीन लाख कोटी रुपयांचं कर्ज दिलं जाईल. यासाठी काउंटर गॅरंटी किंवा कोणतीही मालमत्ता दाखवण्याची गरज भासणार नाही. हे कर्ज २५ कोटी रुपयांपर्यंत असेल. त्यापैकी १०० कोटी रुपयांची उलाढाल असलेल्या कंपन्यांना फायदा होणार आहे. हे चार वर्षांसाठी कर्ज असेल. पहिल्या वर्षात मुद्दल वसूल केली जाणार नाही. ३१ ऑक्टोबर २०२० पर्यंत यावर कोणतेही हमी शुल्क आकारलं जाणार नाही. याचा फायदा ४५ लाख उद्योजकांना होणार आहे.