आणीबाणी घोषणेच्या ४५ व्या वर्धापन दिनानिमित्त केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी कॉंग्रेसवर निशाणा साधला आहे. आणीबाणीवरुन काँग्रेसवर टीका करताना अमित शहा म्हणाले की, कॉंग्रेसमध्ये लोकशाही नाही आहे. तिथे नेत्यांना गुदमरल्यासारखं वाटत आहे. अमित शहा यांनी कॉंग्रेसला आत्मचिंतन करण्याचा सल्ला दिला आहे. आणीबाणीच्या वर्धापन दिनानिमित्त भाजपने कॉंग्रेसवर सर्वतोपरी हल्ला केला आहे. एका कुटुंबाने सत्तेच्या लोभाने ४५ वर्षांपूर्वी आणीबाणी लागू केली. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी. नड्डा यांनीही ट्विट करून काँग्रेसवर निशाणा साधला आहे.
आणीबाणीची आठवण करून देत गृहमंत्री अमित शहा यांनी गुरुवारी म्हटलं की, “४५ वर्षांपूर्वी या दिवशी सत्तेच्या लोभाने एका कुटूंबाने देशात आणीबाणी लागू केली. रात्रभर हे राष्ट्र तुरुंगात रूपांतरित झालं. प्रेस, कोर्ट, मुक्त भाषण… सर्व संपलं. गोरगरीब आणि दलितांवर अत्याचार झाले.” कॉंग्रेसवर निशाणा साधताना अमित शाह म्हणाले, “लाखो लोकांच्या प्रयत्नांमुळे आणीबाणी काढून घेण्यात आली. भारतात लोकशाही पुन्हा आली, पण कॉंग्रेसमध्ये लोकशाही पूर्ववत होऊ शकली नाही. पक्षाच्या आणि राष्ट्राच्या हितसंबंधांवर एका कुटुंबाचं हित मोठं राहिलं. ही खेदजनक परिस्थिती आजच्या कॉंग्रेसमध्येही दिसत आहे.”
As one of India’s opposition parties, Congress needs to ask itself:
Why does the Emergency mindset remain?
Why are leaders who don’t belong to 1 dynasty unable to speak up?
Why are leaders getting frustrated in Congress?
Else, their disconnect with people will keep widening.
— Amit Shah (@AmitShah) June 25, 2020
कॉंग्रेसच्या कार्यकारी समितीचा संदर्भ देताना अमित शहा म्हणाले की, “नुकत्याच झालेल्या सीडब्ल्यूसी बैठकीत ज्येष्ठ सदस्यांनी आणि तरुण सदस्यांनी काही मुद्दे उपस्थित केले. त्यावर आरडाओरड करण्यात आली आणि त्यानंतर शांत करण्यात आलं. पक्षाच्या प्रवक्त्याला विचार न करता काढून टाकण्यात आलं. दुःखद सत्य म्हणजे कॉंग्रेसमधील नेत्यांना गुदमरल्यासारखं होत आहे.” “कॉंग्रेसला स्वतःला काही प्रश्न विचारण्याची गरज आहे. आणीबाणीसारखी विचारसरणी अजूनही पक्षात का आहे? घराण्यातील नसलेले त्या पक्षाचे नेते बोलण्यास का असमर्थ आहेत? कॉंग्रेसमधील नेते निराश का आहेत? जर त्यांनी प्रश्न विचारला नाही तर लोकांशी त्याचा संबंध आणखी कमी होईल,” असं अमित शाह म्हणाले.
हेही वाचा – महाराष्ट्रात पतंजलीच्या ‘कोरोनिल’वर बंदी
२५ जून १९७५ ते २१ मार्च १९७७ पर्यंत देशात २१ महिन्यांसाठी आणीबाणी लागू करण्यात आली होती. तत्कालीन अध्यक्ष फखरुद्दीन अली अहमद यांनी तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या आदेशानुसार भारतीय घटनेच्या कलम ३५२ अंतर्गत आणीबाणी जाहीर केली होती. आणीबाणीच्या काळात निवडणुका तहकूब करण्यात आल्या आणि नागरी हक्क रद्द करण्यात आले होते.