औरंगाबादमध्ये कोरोना बाधित रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्याने कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आणि कोरोनाची साखळी तोडण्यासाठी प्रशासनाने जनता कर्फ्यू म्हणजेच संचारबंदी लागू केली होती. ही संचारबंदी १० जुलै ते १८ जुलै या कालावधीत लागू करण्यात आली असून आज या संचारबंदीचा शेवटचा दिवस असताना औरंगाबादमध्ये जनता कर्फ्यू वाढणार नसल्याचे आयुक्तांनी जाहीर केले आहे. दरम्यान लोकप्रतिनिधी आणि प्रशासकीय अधिकारी यांच्या बैठकीनंतर हा कर्फ्यू लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला होता.
वारंवार आवाहन करून देखील नागरिक कोणत्याही नियमांचे पालन न करता रात्री उशिरापर्यंत बाहेर फिरताना, रस्त्यावर गप्पा मारताना दिसत असल्याने हा संचारबंदीचा कालावधी वाढवून १८ जुलैपर्यंत केला असल्याचे पोलिसांनी सांगितले होते. तसेच प्रशासनाने नागरिकांना विनाकारण घराबाहेर पडू नये आणि घरापासून दोन किलोमीटरच्या परिघात असलेल्या दुकानातूनच आवश्यक वस्तू खरेदी करण्याचा सल्ला दिला होता. हा आदेश १० जुलै पासून अंमलात आला असून १८ जुलैपर्यंत तो लागू राहणार असल्याचे सांगितले होते.
औरंगाबादमध्ये कोरोना रुग्ण वाढत असल्याने नागरिकांसाठी संचार बंदी लागू करण्यात आली होती. यासह औरंगाबाद शहरातून वाळूजला जाणं आणि तिकडून शहरात येण्यास परवानगी नव्हती. तर औरंगाबाद शहरात काही दिवस जनजागृती करू, मात्र लोकांची मदत मिळाली नाही तर औरंगाबाद मध्ये पूर्ण संचारबंदी लावावी लागेल. असे जिल्हाधिकाऱ्यांनी यापुर्वी सांगितले होते.