ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेत दुखापतींनी भारतीय संघाचा पिच्छा पुरवला. भारताच्या प्रमुख गोलंदाजांना दुखापतींमुळे या मालिकेतून माघार घ्यावी लागली. त्यामुळे चौथ्या कसोटीत भारताला मोहम्मद सिराज, नवदीप सैनी, शार्दूल ठाकूर, नटराजन आणि वॉशिंग्टन सुंदर या नवख्या गोलंदाजांसह मैदानात उतरावे लागले. ब्रिस्बन कसोटीआधी या पाच जणांना मिळून केवळ चार कसोटी सामन्यांचा अनुभव होता. मात्र, या पाचही जणांनी या कसोटीत चांगली कामगिरी केली. खासकरून सिराजची कामगिरी वाखाणण्याजोगी ठरली. त्याने ऑस्ट्रेलियाच्या दुसऱ्या डावात पाच विकेट घेतल्या, ज्यात स्टिव्ह स्मिथ आणि मार्नस लबूशेन यांच्या विकेटचाही समावेश होता. मला आणि भारताच्या इतर नवख्या खेळाडूंना मिळालेल्या यशामागे कर्णधार अजिंक्य रहाणेचा पाठिंबा हे मुख्य कारण असल्याचे सिराज म्हणाला.
First Test five-wicket haul for Mohammed Siraj 👏#AUSvIND | #WTC21 pic.twitter.com/8niDOfm2Oi
— ICC (@ICC) January 18, 2021
अजिंक्यचे आभार मानतो
बऱ्याच प्रमुख खेळाडूंना दुखापती झाल्याने युवा खेळाडूंना या मालिकेत खेळण्याची संधी मिळाली. नटराजन असो किंवा वॉशिंग्टन सुंदर, सर्वच युवकांनी त्यांना मिळालेल्या संधीचे सोने केले. आम्ही सर्वच युवकांनी चांगली कामगिरी केली. आमच्या या यशात कर्णधार अजिंक्य रहाणेची भूमिका महत्वाची आहे. त्याने आमच्यावर विश्वास दाखवला आणि आम्हाला खूप पाठिंबा दिला. तो सतत माझ्याशी संवाद साधत होता आणि त्यामुळे माझा आत्मविश्वास वाढला. मी अजिंक्यचे आभार मानतो, असे सिराजने नमूद केले.