सोमवारी राज्याचा अर्थसंकल्प सादर करण्यात आला. राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी अर्थसंकल्प मांडताना प्रत्येक महसुली मुख्यालयाच्या परिसरात अत्याधुनिक राजीव गांधी विज्ञान व तंत्रज्ञान पार्क स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची घोषणा केली. सध्या देशात फसव्या विज्ञानाचा जाणीवपूर्वक प्रसार होत आहे. अशा परिस्थितीत भावी पिढीच्या मनात अभिजात वैज्ञानिक दृष्टीकोन रुजवणे, ही आपली जबाबदारी आहे. त्यामुळे प्रत्येक महसूल मुख्यालयाच्या परिसरात अत्याधुनिक अशा राजीव गांधी विज्ञान व तंत्रज्ञान पार्कची उभारणी करण्यात येईल. त्यासाठी एकूण ३०० कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे, असे अजित पवार म्हणाले.
मुंबईच्या नेहरू सेंटरमध्ये अत्याधुनिक यंत्राची खरेदी, आधुनिकी आणि नूतनीकरणासाठी १० कोटींचा निधी देण्यात आला आहे. त्याचप्रमाणे जीर्ण अवस्थेत असलेल्या शाळांच्या पुनरुज्जीवनासाठी ३ हजार कोटींची तरतूद करण्यात आली आहे. सातारच्या सैनिक शाळेला येत्या तीन वर्षांत ३०० कोटींचा निधी देण्यात येणार असून त्यापैकी १०० कोटी रुपयांचा निधी २०२१-२२ मध्ये देण्यात येईल.
शालेय शिक्षण आणि क्रीडा विभागासाठी २ हजार ४६१ कोटी रुपयांचा नियत्वे प्रस्तावित असल्याची अजित पवार यांनी घोषणा केली. क्रीडा विभागाबाबत बोलताना ते म्हणाले, मागील अर्थसंकल्पिय भाषणात मी आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठ स्थापन होणार असल्याचे घोषित केले होते. त्यानुसार पुणे येथे महाराष्ट्र आंतरराष्ट्रीय विद्यापीठ स्थापन करण्यात आले आहे. पहिल्या टप्प्यात तिथे क्रीडा विज्ञान, क्रीडा तंत्रज्ञान, क्रीडा शिक्षण आणि क्रीडा प्रशिक्षण अशा चार अभ्यासक्रमांसाठी २०० विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात येणार आहे. २०२१-२२ वर्षासाठी कार्यक्रम खर्चासाठी शालेय शिक्षण व क्रीडा विभागासाठी २ हजार ४६१ कोटी रुपयांचा नियत्वे प्रस्तावित आहे.