देशाचे ९ हजार कोटी घेऊन फरार झालेल्या विजय माल्ल्याने एक धक्कादायक खुलासा केला आहे. भारतातून फरार होण्यापूर्वी केंद्रीय अर्थमंत्री अरूण जेटली यांची भेट घेतल्याचा धक्कादायक दावा विजय माल्ल्याने केला आहे. ‘भारत सोडण्यापूर्वी अरूण जेटलींना भेटून बँकांसोबत सुरू असलेला वाद ‘सेटल’ करण्यासाठी भेटलो होतो आणि त्यांना सेटलमेंटची ऑफर दिली होती’, असं वक्तव्य विजय माल्ल्याने लंडनमध्ये पत्रकारांशी बोलताना केलं आहे. त्यामुळे आता केंद्रातील भाजप सरकार आणि स्वत: अरूण जेटली यांच्यासमोरच्या अडचणी वाढणार आहेत.
सुनावणी हस्तांतरणाची, खुलासा जेटलींवर!
विजय माल्ल्या याच्या हस्तांतरणाविषयीच्या याचिकेवर सध्या लंडन येथील न्यायालयात सुनावणी सुरू आहे. विजय माल्ल्याचं भारताकडे हस्तातंरण केलं जावं की नाही? यासंदर्भातील निर्णय या सुनावणीतून येणे अपेक्षित आहे. या सुनावणीदरम्यान बाहेर आलेल्या विजय माल्ल्याने पत्रकारांशी बोलताना हा धक्कादायक खुलासा केला आहे.
काय म्हणाला विजय माल्ल्या?
मला भारत सोडण्यापूर्वी बँकांसोबत सेटलमेंट करायची होती. त्यासाठी मी भारत सोडण्यापूर्वी केंद्रीय अर्थमंत्री अरूण जेटली यांची भेट घेतली होती. त्यांना सेटलमेंटची ऑफर देखील दिली होती.
आता भाजपचं काय होणार?
दरम्यान, विजय माल्ल्याने अरूण जेटलींची भेट घेतल्यासंबंधी कोणतीही माहिती किंवा कबुली भाजपकडून आजतागायत देण्यात आली नव्हती. मात्र, आता माल्ल्याने लंडनमध्ये केलेल्या धक्कादायक खुलाशानंतर भाजपच्या अडचणींमध्ये वाढ होणार आहे. एकीकडे अवघ्या काही महिन्यांवर लोकसभा निवडणुका आल्या असतानाच अरूण जेटलींसारख्या मोदींच्या मंत्रिमंडळातील महत्त्वाच्या आणि ज्येष्ठ मंत्र्यावर अशा प्रकारे आरोप झाल्यामुळे आणि स्वत: विजय माल्ल्यानेच त्याची कबुली दिल्यामुळे विरोधकांसोबतच मतदारांच्याही रोषाचा भाजपला सामना करावा लागणार आहे.
I met the finance minster to settle matters before I left. The banks had filed objections to my settlement letters: Vijay Mallya outside London’s Westminster Magistrates’ Court
— ANI (@ANI) September 12, 2018