जमीनीला जमिन देऊन आमच्या हक्काचे पुनर्वसन करा. त्याशिवाय धरणातील पाण्याचा एक थेंबही धरणाच्या बाहेर जाऊन देणार नाही, असा इशारा देत भामा-आसखेड धरणग्रस्त शेतकरी गेल्या दोन दिवसांपासून धरणाच्या पाण्याजवळ बसून आंदोलन करत आहे. सध्याची पाणीटंचाई पाहता पूर्व भागात पिण्यासाठी आणि शेतीसाठी पाण्याची मागणी जोर धरत आहे. त्यामुळे धरण व्यवस्थापनाकडून भामा नदी पात्रात पाणी सोडण्याच्या हालचाली सुरु झाल्या आहेत. तर धरणग्रस्त शेतकरी धरणातील पाणी सोडून देणार नाही, असा इशारा देऊन धरण परिसरात कडक पहारा देण्यासाठी बसले आहेत.
राजगुरुनगर येथे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी घेतलेल्या शेतकरी मेळाव्यात भामा-आसखेडसह सर्व धरणग्रस्तांचे पुनर्वसन होईपर्यंत एक थेंबही पाणी बाहेर जाऊ देणार नाही आणि शेवटपर्यंत धरणग्रस्तांच्या पाठीशी मी उभा राहिल, असे सांगितले होते. मात्र तरिही धरणातील पाणी पोलीस बंदोबस्तात सोडण्याच्या हालचाली सुरु असल्याची भिती धरणग्रस्तांना वाटत आहे.
काल झालेत – भामा-आसखेड धरणग्रस्त पुन्हा आक्रमक
गेल्या दोन दिवसांपासून भामा-आसखेड धरणग्रस्त धरणाच्या करंजविहिरे येथील पात्रात धरणग्रस्त शेतकरी थांग मांडून बसले असतानाही एकही लोकप्रतिनिधीसह शिवसेना खासदार, आमदार हे धरणग्रस्तांची बाजू ऐकायला याठिकाणी पोहचला नाही. त्यामुळे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी धरणग्रस्तांना दिलेला पाठिंबा स्थानिक नेत्यांना लक्षात आला नाही का? असा प्रश्न धरणग्रस्त शेतकरी विचारत आहेत.
आमच्या हक्कांचे पुनर्वसन होऊन जमिनीच्या बदल्यात जमिनीचे वाटप त्वरीत करा तरच पाणी सोडू देणार. अन्यथा जीव गेला तरी बेहत्तर, पण मागे हटणार नाही. राजकिय नेत्यांनी राजकारण न करता धरणग्रस्तांच्या पाठीशी खंभीरपणे उभे रहा आणि भामा-आसखेड लाभ क्षेत्रातील ज्या गावांना शेती आणि पिण्याच्या पाण्याची गरज आहे, अशा सर्व गावांनी धरणग्रस्तांच्या भावना समजून घेऊन त्यांच्यामागे उभे रहावे. – देवीदास बांदल, धरणग्रस्त शेतकरी
आमच्या ४०३ निकालप्राप्त शेतकऱ्यांना जमिनीचे वाटप आणि उर्वरीत शेतकऱ्यांना योग्य न्याय द्या. तेव्हाच पाण्याचे आवर्तन सोडण्याचा विचार करु. प्रकल्पग्रस्तांची एकजूट कायम असून आता माघार नाही. मावळची पुनरावृत्ती झाली तरी बेहत्तर पण आमचा ३० वर्ष पुनर्वसनसाठी वनवन करणाऱ्या शेतकऱ्याला न्याय द्या, अन्यथा पाण्याचा एक थेंबही कोणाला देणार नाही. – सत्यवान नवले, धरणग्रस्त कृती समिती सदस्य