सिंधुदुर्गः भारतीय जनता पक्ष पुरस्कृत सिद्धिविनायक पॅनलने सिंधुदुर्ग जिल्हा बँकेवर दणदणीत विजय मिळवलाय. ११-८ च्या फरकानं राणेंनी पर्यायनं भाजपनं जिल्हा बँकेची सत्ता काबीज केलीय. त्यानंतर केंद्रीय सूक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योगमंत्री नारायण राणे कणकवलीत पोहोचलेत. त्यांनी कणकवलीत पत्रकार परिषद घेत महाविकास आघाडीच्या नेत्यांवर हल्लाबोल केलाय.
आता आमचं महाराष्ट्र सरकारवर लक्ष आहे. अजून दोन-अडीच वर्षे आहेत. लोकसभा, विधानसभेकडे आमचं लक्ष आहे. तिन्ही जिल्ह्यांत ज्या काही विधानसभेच्या निवडणुका होतील, त्याकडे आमचं लक्ष आहे. लोकसभेचा खासदार हा भारतीय जनता पक्षाचाच असेल. नको असलेल्या चेहऱ्यांकडे लोकप्रतिनिधीपद आमचा जिल्हा ठेवणार नाही. ज्यांना हात नाही ते हाती सत्ता घेतात, कशी पकडतात माहीत आहे का?, असंही नारायण राणे म्हणाले.
काल आमच्या एका महिलेनं तोंड बंद केलं. तोंड बंद होत नाही तेव्हा हड हड हे काय आहे मला कळलं नाही. पुरुष कधीपासून हड बोलायला लागले. व्हिडीओ शूट केलाय ना तो दाखवा ना. आज यांचा इथे सत्कार आहे. त्यांनी बँकेचे पैसे वाटले ते त्याचे नसतील. बँकेचे, भ्रष्टाचारानं मिळवलेले पैसे त्यामुळे त्याचं काही गेलं नाही. जे काही गेलं बँकेचं गेलं. त्यांनी आता बोलू नये, गप्प बसावं. आपली औकात काय, 36 मतं मिळवू शकत नाही आणि विधानसभेच्या गोष्टी करतात. आम्ही गड न जाऊ देता सगळंच जिंकतो, असे राजकारणी आहोत. आता आम्ही सत्ताही जिंकलीय. गड गेला पण सत्ता आमचीच आहे. इथून दिल्लीपर्यंत आहे. राजन तेलींनी राजीनामा अध्यक्षांकडे दिलाय. तो निर्णय आमचे वरिष्ठ घेतील. जो वरिष्ठ निर्णय घेतील तो आम्हाला मान्य आहे. ही काय शिवसेना नाही, असंही नारायण राणेंनी अधोरेखित केलंय.
ही निवडणूक धनलक्ष्मीबरोबर कायद्याचा वापर करून जिंकण्याचा प्रयत्न करत होते. पोलीस यंत्रणा वापरली. नितेश राणेंच्या बेल अॅप्लिकेशनवरची सुनावणी चार चार दिवस चालते. 50 वर्षांच्या राजकीय जीवनात मी हे पाहिलेलं नाही. डीजी, अॅडिशनल डीजी येऊन ठाण मांडतात. एका जिल्हा बँकेच्या निवडणुकीसाठी ती पक्ष एकत्र आहेत. अर्थखात्याचे मंत्री येतात आणि तिन्ही पक्षांचा पराभव करून जातात. त्याला अक्कल म्हणतात, असंही ते अजितदादांना उद्देशून म्हणालेत.
आम्हाला भारतीय जनता पक्षाचा मुख्यमंत्री हवाय. लगानची टीम आम्हाला नकोय. पोलीस यंत्रणा आहे ना हे पोस्टर लावायचाच लायकीचे आहेत. दुसरे काय करणार पोस्टर लावायचाच लायकीचे आहे. राज्य कारभार करायची यांची लायकी नाही. ना राज्यात ना बँकेचे. मी टीव्हीवर पाहतो कलर का बदलला आहे ते. बायको हॉस्पिटलमध्ये कामाला आहे म्हणून पट्ट्या लावून यायचं. त्याला साधं खरचटलं होतं आणि अर्थमंत्री सत्काराला येतात. काय कमी मार खाल्लास, अजून खायला पाहिजे होता. सर्वांना पुरून उरलोय आणि केंद्रापर्यंत पोहोचलोय. मध्ये कुठेच थांबलेलो नाही. मला चौकशांचा काही फरक पडत नसल्याचंही त्यांनी सांगितलंय.