उद्धव ठाकरेंनी मातोश्रीवर हनुमान चालीसा पाठण करावे असे आव्हान राणा दाम्पत्यांने राज्याच्या मुख्यमंत्र्यांना दिले होते. या आव्हानानंतर आज वांद्रे येथील ठाकरे कुटुंबीयांचे निवासस्थान असलेल्या मातोश्री येथे शिवसैनिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहत शक्तीप्रदर्शन केले. तर दुसरीकडे अमरावतीत राणा दांम्पत्य हे हनुमान मंदिरात हनुमान चालीसा पठण करताना दिसले. मोठ्या प्रमाणात शिवसैनिकांनी मातोश्रीसमोर प्रदर्शन केले. तसेच राणा कुटुंबीयांनी हिंमत असेल तर याठिकाणी हजेरी लावून दाखवावी असेही आव्हान त्यांनी यावेळी दिले.
एकीकडे मनेसेने मशीदीचे भोंगे उतरवण्याच्या निमित्ताने हनुमान चालीसा पठणाचा अल्टीमेटम महाविकास आघाडी सरकारला दिला आहे. तर राम नवमीच्या दिवशी मनसैनिकांकडून शिवसेना भवन येथे लाऊडस्पिकरवर हनुमान चालीसा पठणाचा प्रयत्न झालेला पहायला मिळाला. या वादामध्ये आता राणा दांम्पत्याने उडी घेतली आहे. राणा दांम्पत्याने थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनाच आव्हान देत हनुमान चालीसा पठण करायला सांगितले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हनुमान जयंतीच्या शुभपर्वावर हनुमान चालीसा मातोश्रीमध्ये वाचायला हवी. बाळासाहेबांचे विचार जागृत केले पाहिजे. जर त्या ठिकाणी हनुमान जयंतीच्या शुभपर्वावर उद्धव ठाकरे हनुमान चालीसा वाचत नसतील, तर मला वाटतं त्यांना कुठे तरी बाळासाहेबांचा विसर पडलाय. ते विचार जागृत करण्यासाठी मी आणि नवनीत राणा मातोश्रीवर जाऊन हनुमान चालीसा वाचू, असं रवी राणा म्हणाले.
हिंमत असेल तर आव्हान पुर्ण करावे
शिवसेनेला आव्हान देण्याचा प्रयत्न करू नये. रवी राणा हे छोटे आहेत, त्यांची औकात नाही. एवढी हिंमत असेल तर त्यांनी दिलेले आव्हान पुर्ण करावे. शिवसेनेला जाणून बुझून डिवचण्याचा तसेच भावना भडकवण्याचा किंवा चिथवण्याचा प्रयत्न करू नये. कायदा आणि सुव्यवस्था जरी आमच्या हातात सत्ताधारी असली तरीही आम्ही आधी शिवसैनिक आहोत असे मत राज्याचे परिवहन मंत्री आणि स्थानिक आमदार अनिल परब यांनी व्यक्त केली. राणा दांम्पत्याने नेहमीच सुपाऱ्या घेऊनच काम केले आहे. त्यांचा जो बोलवता धनी असतो, त्यानुसार स्क्रिप्ट वाचण्याचे ते काम करतात. त्यामुळे सेनेला हिंदुत्व शिकवू नये, शिवसेनेचा श्वास हिंदुत्व आहे असेही परब म्हणाले.