दिलीप कोठावदे । नाशिक
सध्या नाशिकमध्ये डोळे येण्याची साथ आल्याचे निदर्शनास आले असून बहुसंख्य नेत्र विकार तज्ञांकडे डोळ्यांच्या तक्रारी करणार्या रुग्णांची संख्या वाढली आहे. डोळ्यातून पाणी आणि घाण येणे, डोळे लाल होणे ही या आजाराची प्राथमिक लक्षणं आहेत. डोळे येण्याचा संसर्ग सामान्यपणे प्रथम एकाच डोळ्याला होतो. मात्र एक डोळा आल्यानंतर दुसर्या डोळ्यालाही संसर्ग होतो. त्यामुळे हा संसर्ग टाळण्यासाठी काळजी घेण्याचं आवाहन नेत्र विकार तज्ज्ञांकडून करण्यात आलं आहे.
डोळ्यातील पांढरा भाग आणि पापणीखालील भागात पारदर्शक पडदा असतो, त्याला कॅान्जुक्टीव्ह म्हणतात. या भागाची जळजळ होते. आग होऊन डोळे चोळावेसे वाटतात. त्यालाच ‘डोळे आले’ असे म्हणतात. डोळे आल्यानंतर ते नेमके कोणत्या प्रकारामुळे आले आहेत, याचे निदान करून उपचार करायला हवेत. काहीवेळा संसर्गामुळे डोळे येतात तर काहीवेळा ऍलर्जीमुळे डोळे येतात.
सद्यस्थितीत पावसाळी वातावरणातील बदलांमुळे डोळे येण्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. हा आकडा दिवसेंदिवस वाढत असल्यानं रुग्णांनी बाहेर जाणं टाळावं, असा सल्ला डॉक्टरांकडून देण्यात येत आहे. तसेच, या साथीचं प्रमाण वाढत असल्यानं रुग्णांनी घरी बसून आराम करावा, असा सल्लाही डॉक्टरांनी दिला आहे. गेल्या चारपाच दिवसांपासून डोळ्यांची साथ पसरू लागली आहे. या प्रकारात डोळ्यांना सूज येते,डोळे चुरचुरतात, खुपतात अशीच काहीशी लक्षणं दिसून येत आहेत.
डोळ्यांवर घरगुती उपाय करू नका.
डोळे हा अतिशय महत्वाचा आणि नाजूक अवयव आहे. त्यामुळे डोळे येण्याच्या तक्रारीसाठी घरगुती उपचार करू नयेत. दुसर्याची औषधे वापरू नयेत तसेच डॉक्टरांच्या सल्ल्यानेच उपचार घेण्याचे आवाहन तज्ज्ञांकडून करण्यात आले आहे.
संसर्ग होण्याचे कारण
- डोळे येण्याचा संसर्ग सर्वात आधी एकाच डोळ्याला होतो. पण एक डोळा आल्यानंतर दुसर्या डोळ्यालाही त्याचा संसर्ग होतोच. एकदा व्यक्तीचे डोळे येऊन गेले की, पुन्हा त्याच व्यक्तीला याचा संसर्ग होत नाही, असं अनेकांना वाटतं म्हणून अनेकजण निष्काळजी पणा करतात. पण असं नाही, एकदा संसर्ग होऊन गेल्यानंतरही पुन्हा त्याच व्यक्तीला संसर्ग होऊन डोळे येऊ शकतात.
- डोळे येणे हे सामान्यत: संसर्गामुळे होते. जंतू किंवा बॅक्टेरिया किंवा विषाणू हे डोळे येण्यास कारणीभूत आहेत.
रसायने, द्रव्ये, वायू यामुळे मोठ्या प्रमाणात डोळे येतात. तीव्र प्रकाशकिरणांमुळे डोळे झोंबतात. काही दिवसांनी सुजतात. अलीकडे, कॅान्टॅक्ट लेन्स वापरण्याचे प्रमाण वाढले आहे. त्या लेन्स डॅाक्टरी सल्ल्याने न घेता स्वतःच घातल्यास अपाय होतो. कोणत्याही साधारण कंपनीचे काजळ आणि सौंदर्यप्रसाधनांचा वापर डोळ्यांच्या आरोग्यासाठी कमालीचा घातक असतो.
ही आहेत लक्षण
- डोळे लाल होणे
- डोळ्याच्या कडा लाल होणे
- पापण्या एकमेकांना चिकटणे
- डोळ्यांत सतत काहीतरी गेल्यासारखं वाटणे.
- सतत पाणी येतं.
- तर ही या संसर्गाची सामान्य लक्षणं आहेत. ही लक्षणं आधी एका डोळ्याला आणि
- नंतर दुसर्या डोळ्याला दिसून येतात.
- तुमचे डोळे आले तर, डोळ्याच्या आतल्या कोपर्यांना आणि पापण्यांच्या आतल्या भागांना सूज येऊन लाल दिसतात.
- डोळ्यांतून चिकट पदार्थ बाहेर येतो.
- डोळ्यांना खाज येणं, डोळे जड वाटणं
- तीव्र प्रकाश डोळ्यांना सहन न होणं
- डोळे येण्यासोबतच संसर्गामुळे ताप, सर्दी, खोकला या तक्रारीही जाणवतात.
अशी घ्या काळजी
- डोळे आल्यास डोळ्यांना सतत हात लावू नये.
- डोळे सतत स्वच्छ पाण्यानं धुवावेत.
- डोळे येणं हा संसर्गजन्य रोग असल्यानं प्रवास किंवा बाहेर फिरणे टाळावे.
- कुटुंबीयांपासून दूर राहावे.
- तेलकट खाणे टाळावे.
- डोळ्याची जळजळ व त्रास काही ठराविक दिवसांनंतरही कमी होत नसल्यास डॅाक्टरी सल्ला घ्यावा.
- डोळे आल्यास अस्वच्छ हाताने डोळे चोळू नये. तसेच डोळ्यांना स्पर्श केल्यास लगेच हात धुवून घ्यावेत.
- डोळे आलेल्या व्यक्तींचे कपडे, टॅावेल इतरांनी मुळीच वापरू नयेत.
सद्यस्थितीत डोळे येण्याचे प्रमाण वाढले आहे. डोळ्यांच्या विकारात, डोळे येणे हा प्रकार संसर्गजन्य असून लवकर पसरणारा आजार आहे. कुटुंबातील एखाद्या व्यक्तीला संसर्ग झाला तरी घरातील सर्वांना याची बाधा होऊ शकते. शाळकरी मुले किंवा अधिक लोकसंपर्क असलेल्या बाधित व्यक्ती या आजाराचे वाहक असतात. हा आजार लहान-मोठ्या सर्वांनाच होऊ शकतो. त्यामुळे या आजारात वरील प्रमाणे काळजी घेणे आवश्यक आहे. : डॉ.भावना बागड, नेत्र विकार तज्ञ