२०१८ साली काश्मीरमध्ये घुसखोरी करणाऱ्या ३११ दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे. लष्कराचे कमांडर लेफ्टनंट जनरल अनिल कुमार भट्ट यांनी ही माहिती दिली आहे. यापूर्वी २०१०मध्ये लष्करानं २३२ दहशतवाद्यांना ठार केलं होतं. गृह मंत्रालयानं दिलेल्या आकडेवारीनुसार दहशतवादी कारवायांमध्ये प्रचंड वाढ झाल्याचं दिसून येत आहे. २०१७ साली दहशतवाद्यांच्या घुसखोरीच्या ३४२ घटना घडल्या होत्या. तर, २०१८ साली डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत ४२९ घटना घडल्या आहेत. २०१७ साली दहशतवाद्यांच्या हल्ल्यात ४० नागरिकांना आपला जीव गमवावा लागला होता. तर, यंदा अर्थात २०१८ साली ७७ नागरिकांना आपला जीव गमवावा लागला आहे. तसेच, २०१७ साली ८० आणि २०१८ साली ८० जवानांना आपला जीव गमवावा लागला आहे. सध्याच्या घडीला काश्मीर खोऱ्यामध्ये २५० ते ३०० दहशतवादी सक्रीय आहेत. अशी माहिती गुप्तचर विभागानं दिली आहे.
वाचा – मुंबईत दहशतवादी हल्ल्याची शक्यता
दहशतवाद्यांना जशास तसे उत्तर
जम्मू – काश्मीरमध्ये दहशतवादी कारवाया वाढत आहेत. त्याला जवानांकडून देखील चोख प्रत्युत्तर दिले जात आहे. दिवसेंदिवस दहशतवादांची घुसखोरी वाढत असल्यानं त्याला चोख प्रत्युत्तर द्या असे आदेश गृहमंंत्रालयानं दिले होते. त्यामुळे जवानांनी देखील दहशतवाद्यांना प्रत्युत्तर देत त्यांचा खात्मा केला होता. त्यासंदर्भातील आकडेवारी आता समोर आली आहे. दरम्यान, पाक सैन्याकडून देखील भारतीय चौक्यांना लक्ष्य केले जात असून भारताकडून देखील त्याला चोख प्रत्युत्तर दिले जात आहे. यासंदर्भातील व्हिडीओ देखील भारतानं वेळोवेळी जाहीर केलेले आहेत. भारतानं पाकिस्तानला वाढत्या दहशतवादासंदर्भात तंबी दिली असून पुन्हा एकदा सर्जिकल स्ट्राईक करू असा सज्जड दम देखील दिला आहे.