सर्वत्र नाताळ आणि नवीन वर्षाचे उत्साहात सेलिब्रेशन सुरू असताना याच पार्श्वभूमीवर काही दहशतवादी संघटना भारतावर हल्ला करण्याचा प्रयत्न करत आहेत, अशी माहिती भारतीय सुरक्षा यंत्रणांना मिळाली आहे. माहिती मिळताच मुंबईतील जवळपास सर्वच यंत्रणा दक्ष झाल्या असून हायअलर्टवर काम करत आहेत.
दहशतवाद्यांचे लक्ष भारतातील सर्व मोठ्या बोटी असल्याने ही बाब अतिशय चिंताजनक आहे. हा हल्ला यापूर्वी २००८ साली झालेल्या मुंबई हल्ल्यासारखाच प्लॅन करून केला जाणार असल्याचे समजते. त्यानुसार पोलीस यंत्रनांना अलर्ट करण्यात आले असून सर्व बोटींवर विशेष लक्ष देण्याबाबत आदेश देण्यात आले आहेत.
गुप्तचर विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, हा दहशतवादी हल्ला यशस्वी करण्यासाठी लष्कर-ए-तोयबा आणि हिजबुल मुजाहिद्दीनसारख्या दहशतवादी संघटनांनी मोठी ताकद लावली आहे. त्यासाठी कोणत्याही परिस्थितीत हल्ला घडवून आणण्यासाठी पॅरा कमांडोंना पाकिस्तानातून प्रशिक्षण देण्यात आले आहे. त्यांना प्रशिक्षण देणारे प्रशिक्षक देखील दहशतवादी आत्मघातकी पथकाचा भाग आहेत, अशी माहिती गुप्तचर विभागाकडून मिळाली आहे.