जम्मू-काश्मीरमधून कलम ३७० हटविण्यात आले आहे. त्यानंतर सुरक्षा यंत्रणांनी आवश्यक पावले उचलत आज काश्मीर खोऱ्यातील ७० कैद्यांना आग्र्यातील कारागृहात पाठवले आहे. हवाईदलाच्या विशेष विमानाने या कैद्यांचे स्थानांतरण करण्यात आले. या कैद्यांमध्ये काश्मीर खोऱ्यातील फुटीरतावाद्यांचाही समावेश असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
जम्मू-काश्मीरमधून कलम ३७० हटविण्यात आल्यानंतर आता सुरक्षा यंत्रणांनीसुद्धा आवश्यक पावले उचलण्यास सुरूवात केली आहे. त्यानुसार आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे भाषण सुरू होण्यापूर्वीच कडेकोट बंदोबस्तात दहशतवादी व फुटीरतावाद्यांना हवाईदलाच्या विशेष विमानाने काश्मीरमधून आग्रा येथे आणण्यात आले आहे. यासाठी हवाई दलाचे विशेष विमान वापरण्यात आले. या कैद्यांमध्ये बहुसंख्य कैदी हे दहशतवादी व पाकसमर्थक फुटीरतावादी असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
हेही वाचा – जम्मू-काश्मीर आणि लडाखमध्ये नव्या युगाची सुरुवात झाली आहे – पंतप्रधान
असे केले स्थानांतरण
कैद्यांचे स्थानांतरण करताना कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला होता. यावेळी आग्रा विमानतळावरून या कैद्यांना पोलीस व्हॅनमधून नेण्यात आले. या व्हॅनच्या खिडक्या कपडा लावून झाकण्यात आल्या होत्या. यावेळी कारागृहापर्यंत रस्त्यावर दुतर्फा मोठ्या प्रमाणात पोलीस फौजफाटा तैनात करण्यात आला होता. मध्यवर्ती कारागृहात कडक सुरक्षा बंदोबस्तात असलेल्या बराकीत या सर्व कैद्यांना ठेवण्यात येणार आहे.