येत्या काही दिवसात आसाम विधानसभा निवडणूक होणार असून पहिल्या टप्प्यातील मतदान हे २७ मार्च रोजी होणार आहे. दरम्यान या विधानसभेची तयारी सुरू झाली असून भारतीय जनता पक्ष आणि काँग्रेस पक्ष यांच्यातर्फे निवडणूक प्रचाराला वेग आला आहे. सोमवारी केंद्रीय मंत्री अमित शहा हे पुन्हा एकदा आसामच्या दौऱ्यावर आहेत. अमित शहा यांनी जोनाईमध्ये प्रचारसभेत जनतेला संबोधित केले. यावेळी त्यांनी काँग्रेसवर चांगलाच निशाणा साधला. अमित शहा यांनी असे सांगितले की, तुम्ही ५ वर्ष भारतीय जनता पक्षाला दिले आज आसाम विकासाच्या वाटेवर आहे. ५ वर्षात एक तरी आंदोलन झालं? कोणाचा गोळीबाराने मृत्यू झाला आहे का? आंतकवाद झाला आहे का? याचाच अर्थ काँग्रेस सत्तेत येतं तेव्हा अशांती निर्माण होते, तर भाजपा सत्तेत असताना विकास होतो, असेही अमित शहा म्हणाले.
यासह काँग्रेसला लक्ष्य करताना शहा म्हणाले, ५ वर्षांपूर्वी आसाममध्ये काँग्रेसची सत्ता होती, तेव्हा आंदोलन सुरू होते, गोळीबार होत होता, तर लोकंही मरण पावले यासह कित्येक दिवस कर्फ्यू देखील होता. आंतकवादी खुलेआम संचार करत होते, विकासाचा कोणताही थांग-पत्ता नव्हता. शहांनी असेही सांगितले की, काँग्रेसची निती आहे, तोडा-फोडा आणि राज्य करा. त्यांनी आसाम-बंगाली लोकांमध्ये वादाची ठिणगी पाडली. आसाममध्ये वादाला तोंड फोडले. मात्र भाजपाचं धोरण आहे, ‘सबका साथ-सबका विकास-सबका विश्वास’
शहांनी असेही सांगितले की, ‘आसाममधील भाजप सरकारने मोदींच्या नेतृत्वाखाली कोरोनाचं सकंट असताना आसामचे कोरोना संक्रमणापासून संरक्षण केले त्याबदंदल मी मुख्यमंत्र्यांचे कौतुक करतो. सगळ्यांना वाटायचे आसाममध्ये आरोग्य सेवा चांगल्या नाही, आसामचे कोरोना काळात कसे होईल. मात्र या ठिकाणीच आज कोरोना बाधितांचा आकडा कमी आहे.’ यासह एका प्रचार सभेत भाजपावर पलटवार करताना प्रियंका गांधींनी सांगितले, ५ वर्षे कोणतीही कामगिरी, कोणताही विकास न करणारा भाजपा आसाममध्ये नकारात्मक राजकारण करीत आहे.