बटला हाऊस प्रकरणात दिल्लीतील पोलिस निरीक्षक मोहन चंद शर्मा यांच्या मृत्यू प्रकरणात अखेर निकाल समोर आला आहे. दिल्लीतील साकेत कोर्टाने सोमवारी इंडियन मुजाहिद्दीनच्या अतिरेकी असलेल्या आरिज खानला या प्रकरणात फाशीची शिक्षा सुनावली आहे. तब्बल १३ वर्षे न्यायाच्या प्रतिक्षेत असलेल्या मोहन चंद शर्मा यांच्या पत्नीला अखेर न्याय मिळाला आहे. या निकालानंतर त्यांच्या पत्नीनेही पुढे येत कोर्टाच्या निकालावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. बाटला हाऊस प्रकरणात आपल्या पतीला गमावलेल्या मोहन चंद शर्मा यांच्या पत्नीने अनेक वर्षानंतर न्याय मिळाल्याचे समाधान व्यक्त केले आहे. कोर्टाने निकाल देताना हा रेयरेस्ट ऑफ द रेअयर अशा श्रेणीतील गुन्हा असल्याचे निकालात नमुद केले आहे.
पोलिस निरीक्षक मोहन चंद शर्मा यांच्या पत्नी म्हणाल्या की, हत्येच्या आरोपात आरिज खानला फाशीची शिक्षा सुनावणे हा योग्यच न्याय झाला आहे. अगदी रेयरेस्ट ऑफ रेअर अशा प्रकारच्या गुन्ह्यासाठी कोर्टाने सुनावलेली शिक्षा योग्यच असल्याचे त्या म्हणाल्या. मला न्यायसंस्थेला धन्यवाद द्यायचे आहे. तब्बल १३ वर्षांच्या संघर्षानंतर मला मोठा दिलासा मिळाला आहे. न्यायसंस्थेने आम्हाला खरच न्याय दिला आहे. आतापर्यंत आम्ही या संपुर्ण प्रकरणात कधी न्याय मिळणार याच प्रतिक्षेत होतो.
मोहन चंद शर्मा हे विशेष शाखेचे अधिकारी होते. दिल्लीतील जामिया नगरच्या बटला हाऊस येथे पोलिस आणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत मोहनचंद शर्मा मृत्यूमुखी पडले होते. त्याआधी याठिकाणी साखळी बॉम्बस्फोटामध्ये ३९ जण मृत्यूमुखी पडले होते, तर १५९ जण जखमी झाले होते. शर्मा यांना साखळी बॉम्बस्फोटातील अतिरेकी हे बाटला हाऊसमध्ये असल्याची माहिती मिळाली होती. त्यानंतर आपल्या नेतृत्वात सात जणांच्या टीमसह १९ सप्टेंबर २००८ रोजी त्याठिकाणी पोहचले. पोलिस आणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत त्यांना गोळी लागली होती. या चकमकीत गोळी लागल्याने त्यांचा मृत्यू झाला. मोहन चंद शर्मा यांना मरणोत्तर अशोक चक्र पुरस्काराने गौरविण्यात आले होते.