भाजपच्या खासदार साध्वी प्रज्ञा सिंह यांनी बुधवारी पुन्हा एकदा नथुराम गोडसे देशभक्त असल्याचा पुनरुच्चार केला. यावेळी त्यांनी चक्क लोकसभेत असे विधान केल्याने विरोधी पक्ष आणि सत्ताधारी यांमध्ये गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. परिणामी संसदेचं वातावरण काही काळ चांगलंच तापलं होतं. दरम्यान, या विधानाप्रकरणी प्रज्ञा ठाकूर यांची संरक्षण विषयक समितीमधून हकालपट्टी करण्यात आली आहे.
BJP MP Pragya Singh Thakur tweets over her reported remark in Parliament yesterday, referring to Nathuram Godse as a 'deshbhakt'. She says that she was misquoted and that she was referring to freedom fighter Udham Singh. pic.twitter.com/PaKtUC0Jlp
— ANI (@ANI) November 28, 2019
प्रज्ञा सिंह ठाकूर यांना संसदेच्या सुरक्षा समितीमधून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला असून याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मोठा निर्णय घेतला आहे. याशिवय भाजपाच्या संसदीय दलाच्या बैठकीला उपस्थित राहण्याचा आदेशदेखील ठाकूर यांना देण्यात आला आहे. त्यामुळे ठाकूर यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.
साध्वींवर कारवाईची शक्यता
बुधवारी लोकसभेत एसपीजी दुरुस्ती विधेयकावर चर्चा सुरू होती. त्यावेळी डीएमकेचे खासदार ए. राजा यांनी गोडसेने महात्मा गांधीजींची हत्या का केली? असा संदर्भ देत होते. ३२ वर्ष गोडसेच्या मनात गांधीजींबाबतचा द्वेष होता. त्यामुळे त्यांनी गांधीजींची हत्या केली. वेगळ्या विचारधारेचा असल्यामुळेच त्यांनी गांधीजींची हत्या केली. तशी कबुलीही गोडसेने दिली होती, असं राजा म्हणाले. तेवढ्यात साध्वी प्रज्ञा सिंह यांनी राजा यांना मध्येच थांबवले आणि तुम्ही एका देशभक्ताचं उदाहरण लोकसभेत देऊ शकत नाही, असं बजावलं. परिणामी संसदेत गदारोळाचे वातावरण निर्माण झाले. यावेळी भाजपच्या खासदारांनी साध्वी प्रज्ञा सिंह यांची बाजू घेत गोंधळ घातला. तर काही खासदारांनी साध्वींना शांत बसण्याची विनंती केली.
दोन्ही बाजूच्या सदस्यांनी आक्रमक पवित्रा घेतल्याने संसदेचं वातावरण चांगलचं तापलं होतं. दरम्यान, या विधानाप्रकरणी साध्वींवर कारवाई होण्याची शक्यता भाजपच्या सूत्रांनी वर्तवली आहे. यापूर्वी लोकसभा निवडणुकी आधी साध्वी प्रज्ञा सिंह यांनी गोडसे देशभक्त असल्याचं म्हटलं होतं. त्यामुळे विरोधकांनी त्यांच्यावर टीका केली होती. त्यामुळे भाजप अडचणीत आली होती. स्वत: नरेंद्र मोदी यांनी या विधानाबद्दल साध्वींना कधीच मनापासून माफ करणार नसल्याचं म्हटलं होतं.
हेही वाचा – अजित पवारच होणार उपमुख्यमंत्री? जयंत पाटलांना मिळणार वेगळं खातं?