असंख्य भारतीयांच्या अपेक्षा आणि महत्वाकांक्षांसह अवकाशाच्या दिशेनं झेपावलेलं चांद्रयान-3 नं मजल दरमजल करत पृथ्वीची कक्षा सोडून चंद्राच्या कक्षेत प्रवेश करणार आहे. चंद्राच्या दिशेनं आता या यानाचा प्रवास सुरू झाला आहे. चांद्रयान-3 ने श्रीहरिकोटा येथून अवकाशात उड्डाणं केलं होतं. आता या मोहिमेतील अतिशय महत्त्वाच्या टप्प्याजवळ आलं आहे. हा टप्पा जर का यशस्वीपणे पार पाडला तर चांद्रयान-3 ही मोहिम यशस्वी ठरणार आहे.
इस्रोने दिलेल्या माहितीनुसार, चांद्रयान-3 आज, 5 ऑगस्ट रोजी चंद्राच्या कक्षेत प्रवेश करेल. इस्रोच्या या संपूर्ण मोहिमेचे यश आणि अपयश या एका गोष्टीवर अवलंबून असेल की चांद्रयान-3 ने चंद्राच्या कक्षेत यशस्वी प्रवेश करणं होय. ही प्रकिया अतिशय सावध आणि नियोजनबद्ध आणि टप्या टप्प्याने केली जाणार आहे. सुरूवातील चांद्रयान-3 चा वेग कमी केला जाईल जेणेकरून चंद्राचे गुरूत्वाकर्षण लूनर ऑर्बिटला स्वत:कडे खेचून घेईल.
जर चांद्रयान-3 ला चंद्राची गुरूत्वाकर्षण कक्षेत प्रवेश करण्यात आपयश आले तर त्याचा परिणाम निराश करणारा असू शकतो. यामुळे यान पृथ्वीच्या गुरूत्वाकर्षणामुळे चंद्रापासून दूर जाऊ शकते किंवा ते चंद्रावर जाऊन कोसळू शकतं. जर चांद्रयान-3 चंद्रापासून दूर झाले तर ते पृथ्वीच्याभोवती अंडाकृती कक्षेत प्रवेश करेल. अशा स्थितीत यान चंद्रापासून दूर जाईल, असं झालंच तर इस्रो पुन्हा एकदा यानावर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न करेल आणि त्याला पृथ्वीवर आणण्याचा प्रयत्न करेल. त्यामुळे चांद्रयान-3 चा चंद्राच्या कक्षेत प्रवेश करण्याचा टप्पा अतिशय महत्त्वाचा आहे.
चांद्रयान -3 चंद्राच्या पृष्ठभागावर कधी उतरणार?
चांद्रयान-3 मोहिमेद्वारे भारताची चंद्रावर उतरण्याची योजना आहे. चांद्रयान-3 यशस्वी झाल्यास चंद्रावर उतरणारा भारत हा चौथा देश ठरेल. तर चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरणारा भारत हा पहिला देश ठरणार आहे. चंद्राचा दक्षिण ध्रुव अधिक काळ अंधारात असतो. या भागात पाण्याचे साठे शोधण्याचाही या मोहिमेमागचा एक हेतू आहे. 14 जुलैला चांद्रयान-3 चं यशस्वी प्रक्षेपण झालं. चांद्रयान-3 यशस्वी प्रक्षेपणानंतर इस्रोचे प्रमुख एस सोमनाथ यांनी सांगितलं होतं की, जर सर्व काही व्यवस्थित पार पडलं तर चांद्रयान 23 ऑगस्ट रोजी संध्याकाळी 5.47 वाजता चंद्राच्या पृष्ठभागावर उतरेल.