नाशिक : बारसू रिफायनरी प्रकल्पावरून भाजप हे महाराष्ट्रद्रोही असल्याची टीका आदित्य ठाकरे यांनी ट्वीट करत केली होती. यावरही देवेंद्र फडणवीस यांनी चोख प्रत्युत्तर दिले. किमान आदित्य ठाकरे तरी अभ्यास, भाषण ऐकून बोलतील असे वाटत होते. परंतु मला असे वाटते की त्यांनी डोळ्याला पट्टी बांधली आहे. त्यामुळे ज्यांनी पट्टी बांधली आहे आणि ज्यांना विरोधाला विरोध करायचा आहे अशा लोकांना उत्तर देऊन फायदा काय? असे म्हणत फडणवीस यांनी आदित्य ठाकरे यांना टोला लगावला.
नाशिक येथे महाराष्ट्र पोलीस प्रबोधिनीत दीक्षांत समारंभानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. यावेळी फडणवीस यांनी ठाकरेंना टोला लगावला. राहुल गांधी प्रकरणावर देवेंद्र फडणवीस म्हणाले की, सुप्रीम कोर्ट म्हणाले की, राहुल गांधी यांनी जे म्हटले आहे, ते अयोग्य आहे. उच्चपदस्थ लोकांनी असे का म्हणू नये, याबाबत देखील स्पष्टीकरण दिले आहे. अशा प्रकारचा निकाल आल्यानंतर एका गोष्टीचे समाधान आहे की, कालपर्यंत सर्वोच्च न्यायालयाला शिव्या देणारे काँग्रेससह विरोधी पक्षाचे नेते सर्वोच्च न्यायालयाचे गुणगान करत आहेत. यातून एक गोष्ट स्पष्ट झाली की आम्हाला न्याय मिळाला तर सुप्रीम कोर्ट चांगले आणि आमच्या विरोधात निकाल गेला तर सुप्रीम कोर्ट वाईट असे चालू असल्याचे देवेंद्र फडणवीस म्हणाले.
सामनामधून भाजपावर अत्यंत खालच्या पातळीवर टीका करण्यात आली आहे. या प्रश्नावर देवेंद्र फडणवीस म्हणाले ’मी सामना वाचत नाही. विधानसभेत औरंगजेबाचा मुद्दा चांगलाच गाजला. यावर प्रकाश आंबेडकरांनी देखील भाष्य केले. यावर फडणवीस म्हणाले की, विधानसभेत औरंगजेब या विषयावर चांगली चर्चा झाली असून यावर आता कुणाला उत्तर देण्याची आवश्यकता वाटत नसल्याचे ते म्हणाले.
पोलीसांची १८ हजार पदं भरणार
मागच्या तीन वर्षांत पोलीस भरती झाली नाही, त्यामुळे पोलिस खात्यात निर्माण झालेला बॅकलॉग भरून काढण्यासाठी यावेळी 18 हजार पोलीसांची पदे भरली जाणार असल्याची माहिती फडणवीसांनी दिली. महाराष्ट्र पोलीस दल देशातील अतिशय प्रशिक्षित अतिशय शिस्तबद्ध असं पोलीस दल आहे. देशामध्ये आपल्या पोलिस दलाचा एक मोठा नावलौकिक आहे जी काही नवीन युगाची आव्हान काय आहेत, आर्थिक गुन्हेगारी याबाबतची प्रशिक्षण पोलिसांना देत आहोत. नवीन युगाची आव्हाने पेलण्याकरता आपले पोलीस दल सज्ज असणार आहे देशातला सगळ्यात मोठा सायबर प्लॅटफॉर्म महाराष्ट्रात तयार करत असून आपण एकाच प्लॅटफॉर्मवर सोशल मीडिया बँकिंग सेक्टर नॉन बँकिंग संघटना असतील सर्व प्रकारच्या आर्थिक व्यवहार करणार्या आर्थिक संस्था असतील, अशा सगळ्यांना एका प्लॅटफॉर्मवर आणण्याचा सरकारचा प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगितले.