स्वित्झरलॅंडः उद्योग व व्यवसायाची देवाण घेवाण करणाऱ्या दावोस परिषदेला स्वित्झरलॅंड येथे आजपासून सुरुवात होणार आहे. भारतातून शंभर तर जगभरातून हजारहून अधिक प्रतिनिधी या परिषदेत सहभागी होणार आहेत. स्वित्झरलॅंड येथील बर्फाळ प्रदेशात दावोस शहर आहे.
कोरोनामुळे दोन वर्षे ही परिषद झाली नाही. एकदा ही परिषद ऑनलाइन झाली होती. दोन वर्षांनंतर प्रत्यक्ष स्वरुपात होणारी ही बैठक भव्य होणार असल्याचे बोलले जात आहे. सध्या जगावर पर्यावरण संकट आहे. युक्रेन व रशियाचे युद्ध, या युद्धाचा जगावर झालेला व होणारा परिणाम, भू गर्भातील बदल, राजकीय सत्ता बदल या सर्वांमुळे दावोसची परिषद वादळी ठरणार असल्याचे बोलले जात आहे. पुढील पाच दिवसांत या परिषदेत ५० हून अधिक पंतप्रधान व राष्ट्राध्यक्ष सहभागी होतील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
भारतातून केंद्रीय मंत्री मनसुख मांडविया, अश्विनी वैष्णव, स्मृती ईराणी व आर के सिंग हे दावोसच्या परिषदेत सहभागी होणार आहेत. तसेच वरीष्ठ सनदी अधिकारी, उद्योगपती या परिषदेत भारताचे प्रतिनिधीत्त्व करणार आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे परिषदेला गेले आहेत. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ व बसवराज बोम्मई हे दावोसच्या परिषदेला जाणार होते. पण त्यांचा दावोस दौरा करण्यात आल्याचे समजते.
राज्यसभा सदस्य राघव चड्डा, तेलंगणाचे मंत्री के. टी. रामाराव व तामिळनाडूचे मंत्री थंगम थेनारासू हेही दावोसला गेले आहेत. उद्योगपती गौतम अदानी, संजीव बजाज. कुमार मंगलम बिरला, एन चंद्रशेखरन, नादिर गोदरेज, सज्जन जिंदाल, सुनील मित्तल, रोशनी नादर मल्होत्रा, नंदन निलेकणी, अदार पुनावाला व रिषद प्रेमजी हे दावोसला परिषदेसाठी गेले आहेत.
या दौऱ्यावरून शिंदे-फडणवीस सरकारवर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी टीका केली. राजकारण करण्यासाठी शिंदे-फडणवीस सरकारला वेळ आहे. पण उद्योग परिषदेला जाण्यासाठी वेळ नाही, असा टोला खासदार राऊत यांनी हाणला होता. तसेच उद्योग आणण्यासठी दावोसपेक्षा गुजरातला जा, अशी खोचक टीका खासदार राऊत यांनी केली.