दिल्लीच्या सिंघू सीमेवर पुन्हा एकदा शेतकरी आणि दिल्ली पोलिसांमध्ये शुक्रवारी धुमश्चक्री उडाली आहे. सिंघू सीमेवर आंदोलन करत असलेल्या शेतकर्यांच्या विरोधात स्थानिक रहिवासी निदर्शने करण्यासाठी आले. यावेळी पोलीस आणि आंदोलकांमध्ये झटापट झाली. अलीपूरच्या एका पोलीस अधिकार्यावर आंदोलनकर्त्याने तलवारीने हल्ला केल्याची माहिती समोर आली आहे. हल्लेखोराला पोलिसांनी अटक केली आहे. हल्ल्यात पोलीस अधिकारी गंभीर जखमी झाला आहे.
प्रदीप कुमार हे सिंघू सीमेवर कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी ड्यूटीवर होते. यावेळी आंदोलक शेतकरी आणि स्थानिक नागरिकांमध्ये झटापट झाली. यात शेतकरी आंदोलकांकडून एकाने तलवारीने वार करण्यास सुरुवात केली, असे प्रदीप कुमार यांनी सांगितले.
२६ जानेवारी रोजी लाल किल्ल्यात झालेल्या हिंसाचाराच्या घटनेचा निषेध व्यक्त करण्यासाठी आणि सीमेवरून शेतकर्यांनी हटावं यासाठी स्थानिक नागरिक शुक्रवारी सिंघू सीमेवर शेतकर्यांच्या विरोधात निदर्शने करण्यासाठी आले होते. याच वेळी दोन्ही गटांमध्ये दगडफेकीला सुरुवात झाली आणि परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेली. त्यामुळे पोलिसांनी हस्तक्षेप करत लाठीचार्ज करायला सुरुवात केली. शेतकरी आंदोलकांनी लालकिल्ल्यावर भारताच्या राष्ट्रध्वजाचा अपमान केला असून त्यांना आंदोलन करण्याचा कोणताही अधिकार आता राहिलेला नाही, असे स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे. सिंघू सीमेवर रस्ता अडवून बसलेल्या शेतकर्यांनी माघारी जावे, अशी मागणी स्थानिक नागरिक करत आहेत.