लंडनमधील एका संस्थेने जगभरातील महिलांच्या सुरक्षेवर आधारीत केलेले सर्वेक्षण दोन दिवसांपूर्वी जाहीर केले होते. त्यासाठी संस्थेने ५५० हुन अधिक लोकांशी सवांद साधला. भारत हा महिलांसाठी सिरिया आणि अफगाणिस्तानपेक्षा अधिक असुरक्षित असल्याचा निष्कर्ष या सर्वेक्षणाअंती काढण्यात आला होता. या सर्वेक्षणावर काल अनेकांनी टीका केली होती. तसेच आज हे सर्वेक्षण राष्ट्रीय महिला आयोगाने नाकारले आहे. त्याचबरोबर महिला आयोगाचे असे म्हणणे आहे की, या सर्वेक्षणात ज्या देशांचा नंबर भारताच्या खाली आहे, त्या देशांमध्ये महिलांना बोलू देखील दिले जात नाही. अशा देशांसोबत भारताची तुलना करणे चुकीचे आहे.
आखाती देशांशी तुलना नको
लंडनमधील थॉमसन रायटर्स फाऊंडेशन या संस्थेने हे सर्वक्षण केले असून यामध्ये भारत हा महिलांसाठी सर्वात असुरक्षित देश असल्याचे म्हटले आहे. भारता पाठोपाठ अफगाणिस्तान आणि सिरिया या देशांचा अनुक्रमे दुसरा आणि तिसरा क्रमांक आहे. त्यापुढे सोमालिया आणि सौदी अरब या देशांचे क्रमांक लागतात. सर्वेक्षणात असे म्हटले आहे की, भारतात महिलांचे सर्वाधिक प्रमाणात लैंगिक शोषण केले जाते. तसेच महिलांना गुलाम बनवले जाते, असे सर्वेक्षणात नमूद केले आहे.
सर्वेक्षणावर भारतीयांची टीका
ज्या ५५० लोकांनी या सर्वेक्षणासाठी स्वत:ची मतं नोंदवली आहेत. त्या लोकांना भारताविषयी किती माहिती आहे. त्या लोकांना अफगाणिस्तान, सिरिया, सोमालिया, लिबिया, सौदी अरब, इराण, इराक आणि इतर आखाती देशांमधील परिस्थितीविषयी किती माहिती आहे. लंडनमध्ये राहत असलेले लोक भारतासह आशियाई देशांमधील परिस्थितीवर कसे काय भाष्य करु शकतात? असेही प्रश्न विचारले जात आहे.
‘त्या’ देशांमध्ये महिलांना बोलूही दिले जात नाही
राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा रेखा शर्मा यांनी थॉमसन रॉयटर्सचे सर्वेक्षण नाकारले आहे. शर्मा म्हणाल्या की, ‘ज्या लोकांनी या सर्वेक्षणात स्वत:ची मतं नोंदवली आहेत. त्यांना भारताविषयी फारशी माहिती नाही.अपुऱ्या माहितीअभावी त्यांनी भारताला सर्वात वरचा क्रमांक दिला नसता. ज्या देशांमध्ये महिलांना बोलू दिले जात नाही, अशा देशांचा क्रमांक भारताच्या खाली आहे’.
सर्वेक्षणाची विश्वासार्हता तपासावी
सदर सर्वेक्षणात सहभागी झालेल्या लोकांनी ऑनलाईन पद्धीतीने आणि फोनवरुन त्यांची मतं नोंदवली आहेत. त्यांची ओळख कोणालाच माहीत नाही. तसेच यामध्ये युरोपीयन, अमेरिकन, आफ्रीकन आणि आशियाई देशांतील लोक सहभागी झाले होते. या लोकांचा संपूर्ण जगातील विविध देशांमधील सुरक्षेच्या विषयांवर, महिलांच्या प्रश्नांबाबत किती अभ्यास आहे, हे तपासणे गरजेचे आहे. असे म्हणत भारतीयांनी सर्वेक्षणावर आणि त्यामध्ये सहभागी लोकांच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे.