कर्नाटकातील जेडीएस-काँग्रेस आघाडीतील बिघाडी अधोरेखीत करणारी बातमी आहे. कर्नाटकचे मुख्यमंत्री एच.डी. कुमारस्वामी यांनी काँग्रेसकडून वारंवार होणाऱ्या टीकेला कंटाळून राजीनामा देण्याची धमकी दिली आहे. कर्नाटकात राजकीय आघाडी झाल्यापासून मुख्यमंत्री कुमारस्वामी यांनी ६ महिन्यात दुसऱ्यांदा राजीनामा देण्याचा इशारा दिलाय. त्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाल्याचे चित्र आहे.
राजकारण आले रंगात
भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्याच्या उद्देशाने काँग्रेसने कर्नाटकात जनता दल सेक्युलरशी (जेडीएस) आघाडी करून कुमार स्वामी यांना मुख्यमंत्री पद दिले आहे. परंतु, स्थानिक काँग्रेसच्या नेत्यांना सिद्धरामय्या मुख्यमंत्री बनावेत असे वाटते. यातून राजकारण रंगात आले असून एच.डी. कुमारस्वामी यांच्यावर काँग्रेस पक्षातून टीकेची झोड उठवली जातेय. सिद्धरामय्या समर्थकांनी रविवारी एका कार्यक्रमात त्यांचं स्वागत केलं. या दरम्यान काँग्रेसचे मंत्री सी पुत्तरंगा शेट्टी उपस्थीत होते. त्यावेळी काँग्रेसचे आमदार म्हणाले की, आम्ही अजूनही सिद्धरामय्या यांनाच मुख्यमंत्री मानतो. कर्नाटक सरकारवर टीका करत काँग्रेस आमदार एसटी सोमशेखर म्हणाले, आघाडीच्या सरकारला ७ महिने झाले आहेत, परंतु अद्यापही विकासाच्या नावावर काहीही केलेलं नाही. जर सिद्धरामय्या यांना मुख्यमंत्रिपदाच्या कार्यकाळासाठी आणखी पाच वर्षं मिळाली असती तरी त्यांनी खरा विकास कसा करतात हे दाखवून दिलं असतं.
#WATCH: Karnataka CM HD Kumaraswamy says “…If they want to continue with the same thing, I am ready to step down. They are crossing the line”, when asked ‘Congress MLAs are saying that Siddaramaiah is their CM’.’ pic.twitter.com/qwErh4aEq4
— ANI (@ANI) January 28, 2019
पद सोडण्याची तयारी
वारंवार होणाऱ्या या टीकेला कंटाळून सोमवारी कुमारस्वामी यांनी प्रसिद्धीमाध्यमांशी संवाद साधताना थेट राजीनामा देण्याची धमकी दिली. यावेळी कुमारस्वामी म्हणाले की,”या प्रकारामुळे मी फार चिंतेत आहे. जर असेच सुरू राहिले, तर आपण पद सोडण्यासाठी तयार आहोत. काँग्रेस नेत्यांनी स्वतःच्या आमदारांना नियंत्रणात ठेवलं पाहिजे.” कुमारस्वामी यांनी पद सोडण्याची धमकी दिल्यानंतर काँग्रेस आमदारांकडूनही प्रतिक्रिया आली आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री आणि वरिष्ठ नेते परमेश्वरा म्हणाले, सिद्धरामय्या सर्वश्रेष्ठ मुख्यमंत्री राहिले आहेत. ते आमच्या काँग्रेस आमदारांचे गटनेते आहेत. आमदारांसाठी तेच मुख्यमंत्री आहेत. त्यांनी स्वतःची मतं मांडली आहेत. त्यात चुकीचं काय आहे , आम्ही कुमारस्वामीच्या सरकारमध्येही आनंदी आहोत. गेल्या काही दिवसांपासून जेडीएस आणि काँग्रेस आमदारांमधील मतभेद पराकोटीला गेले आहेत. त्यामुळेच कुमारस्वामी यांनी कॅबिनेटची बैठकही रद्द केली आहे.