लोकसभा निवडणुकीतील सात पैकी चार टप्प्यांमधील मतदान पार पडले असून उर्वरित तीन टप्प्यांमधील मतदानाच्या काळात रमजान देखील सुरु होणार आहे. त्यामुळे या तीन टप्प्यांमध्ये मतदानाची प्रक्रिया सकाळी सातऐवजी पाच वाजल्यापासून सुरु करावी, अशी मागणी करणारी जनहित याचिका मुस्लीम संघटनांनी सुप्रीम कोर्टात दाखल केल्या आहेत. या जनहित याचिकांवरील सुनावणीदरम्यान निवडणूक आयोगाने यासंदर्भात योग्य तो निर्णय घ्यावा, असे निर्देश सुप्रीम कोर्टाने दिले आहेत. त्यामुळे रमजानच्या काळात मतदानाची प्रक्रिया सकाळी सात ऐवजी पाच वाजता सुरु होणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Supreme Court asks Election Commission to decide on pleas for re-scheduling the voting time from 7 am to 5 am in General Election during the month of Ramzan coinciding with the rest of the phases and due to heat-wave conditions in Rajasthan and other areas. pic.twitter.com/Nd952ZxZQ4
— ANI (@ANI) May 2, 2019
पुढील आठवड्यात रमजान सुरु
लोकसभा निवडणुकीसाठी मतदान सात टप्प्यांमध्ये होणार असून यातील चार टप्प्यांमधील मतदान झाले आहे. तर ६, १२ आणि १९ मे रोजी उर्वरित तीन टप्प्यांमधील मतदान होणार आहे. शेवटच्या तीन टप्प्यांमध्ये एकूण १६९ जागांसाठी मतदान होणार आहे. मुस्लीम समाजात रमजानचा महिना पवित्र मानला जातो. यंदा ५ किंवा ६ मेपासून रमजानला सुरुवात होणार आहे. रमजानच्या कालावधीत मतदानाची प्रक्रिया सकाळी सात ऐवजी पाच वाजता सुरु करावी अशी मागणी करणारी याचिका सुप्रीम कोर्टात दाखल झाली होती. या याचिकांवर आज, गुरुवारी सुप्रीम कोर्टात सुनावणी झाली. निवडणूक आयोगाने यासंदर्भात योग्य तो निर्णय घ्यावा, असे सुप्रीम कोर्टाने निवडणूक आयोगाला सांगितले. या याचिकांवर निवडणूक आयोग काय भूमिका घेणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.