नवी दिल्ली : लोकसभा निवडणूक जाहीर होण्यासाठी आता अवघे काही तास शिल्लक आहेत. आणि त्यापूर्वीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासीयांना एक खुले पत्र लिहिले आहे. यात आतापर्यंत केलेल्या सहकार्यासाठी आभार मानतानाच मोदींनी विकसित भारताचा संकल्प पूर्ण करण्यासाठी लोकांकडून सूचना मागवल्या आहेत.
‘माझ्या – तुमच्या नात्याला एक दशक पूर्ण’
‘मेरे प्रिय परिवारजन’ अशी या पत्राची सुरुवात आहे. पुढे मोदी म्हणतात, माझ्या आणि तुमच्या नात्याला एक दशक पूर्ण झालं आहे. तुमचं सहकार्य आम्हाला कायम मिळेल, असा मला विश्वास आहे. राष्ट्र निर्माणासाठी आम्ही सातत्याने कष्ट घेत आहोत, आणि ही मोदींची गॅरंटी आहे. देशातल्या १४० कोटी कुटुंबियांचा विश्वास, समर्थन यामुळे निर्माण झालेलं नातं विशेष आहे. हे नातं शब्दात व्यक्त करणं अवघड आहे. देशातील कुटुंबियांच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडणं, ही आमच्यासाठी मोठी उपलब्धी आहे. शेतकरी, गरीब, युवक आणि महिलांच्या आयुष्यात बदल घडवण्यासाठी आमच्या सरकारने इमानदारीने काम केलं आहे. त्याचे परिणाम आज देशाला दिसत आहेत.
हेही वाचा – Cabinet Meeting : राज्य पोलीस दलात होणार AIचा वापर, राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत महत्त्वाचा निर्णय
PM Narendra Modi writes a letter to his family… pic.twitter.com/3jnysgWLjk
— Narendra Modi For Viksit Bharat (@NaMo4PM) March 15, 2024
भाजप आणि मित्रपक्षांनी लोकसभा निवडणुकीत ४०० जागा जिंगण्याचं लक्ष्य ठेवलं आहे. सरकारचा विकासाचा अजेंडा आणि २०४७ पर्यंत विकसित भारताचा दावा हा भाजपचा निवडणुकीतला महत्त्वाचा मुद्दा आहे. यावरुनच पंतप्रधानांनी थेट लोकांकडून सूचना मागवल्या आहेत.
पंतप्रधानांनी पत्रामध्ये शेवटी म्हटलंय की, लोकशाहीचं सौंदर्य हे लोकसहभागात आहे. देशहितासाठी मोठे निर्णय घेणं, मोठ्या योजना बनवणं आणि त्या लागू करणं लोकांच्या सहकार्याशिवाय शक्य नाही. मला तुमच्या सहकार्याची आणि सूचनांची नितांत गरज आहे. मला विश्वास आहे की, तुमची साथ मला मिळणारच आहे.
हेही वाचा – Electoral Bonds : काळा पैसा पुन्हा राजकारणात येण्याची भीती; अमित शाह यांची प्रतिक्रिया