‘निपाह’ व्हायरसमुळे नर्सचा मृत्यू
केरळमध्ये सध्या निपाह व्हायरसची दहशत पसरली आहे. अनेक रूग्णालयांमध्ये मोठ्या संख्येने रूग्ण उपचार घेत आहेत. त्यासाठी या रूग्णालयांमधले डॉक्टर, नर्स आणि इतर कर्मचारी वर्ग रात्र न् दिवस कष्ट घेत आहेत. मात्र, आपलं आद्य कर्तव्य अर्थात रूग्णसेवा करत असताना एका नर्सला प्राणांना मुकावे लागले आहे. रुग्णांची सेवा करताना ‘निपाह’ची लागण होऊन तिचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. कर्तव्य बजावत असताना या नर्सचा मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे.
गेल्या दोन आठवड्यांपासून केरळमधल्या कोझीकोडे आणि मल्लपुरम भागात या आजाराने सगळ्यांना हादरवून सोडलं आहे. या संसर्गाची लागण होऊन अवघ्या काही तासांमध्ये रुग्णांचा मृत्यू होत आहे. या संसर्गाचे निदान झाल्यानंतर येथील आरोग्य विभागाने आजाराशी दोन हात करण्यासाठी कंबर कसली आहे. यातलीच एक होती लिनी.
केरळमधल्या प्रेरंब्रा तालुका रुग्णालयात निपाहच्या उपचारांसाठी मोठ्या संख्येने रूग्ण उपचार घेत आहेत. या रुग्णालयात रुग्णांच्या सेवेसाठी लिनी पुथ्थुसेरी ही ३१ वर्षीय नर्स कार्यरत होती. पण शनिवारी तिची प्रकृती खालावली. ‘निपाह’ची लागण आपल्याला झाली असेल, याची तिला खात्री होती. कारण, या संसर्गाचे निदान होण्यापूर्वी आलेल्या रुग्णांची सेवा तिने केली होती. त्या रुग्णांमधून तिला याची लागण झाल्याचा अंदाज होता. आणि तो खरा ठरला. या आजाराशी दोन हात करताना सोमवारी रात्री उशिरा तिची प्राणज्योत मालवली.
कुटुंबाला न पाहताच तिने घेतला निरोप
लिनी कुटुंबासोबत चेंबानोदा भागातील पेरुवन्नामुझी भागात राहात होती. तिला सिद्धार्थ (५) आणि रितूल (२) ही मुलं आहेत. पती आखाती देशात असल्यामुळे दोन मुलांना सांभाळण्याची जबाबदारी पार पाडत
होती. लिनीला या संसर्गाची लागण झाल्याचं समोर आल्यानंतर लागलीच तिचा पती भारतात आला. पण तिचा पती आणि तिच्या दोन मुलांना लिनीला भेटता आले नाही. पण मुलांना आणि पतीला शेवटचा निरोप न देताच तिने सोमवारी रात्री अखेरचा श्वास घेतला.
विद्युत दाहिनीत अंत्यसंस्कार
‘निपाह’ व्हायरस हा झपाट्याने पसरत चालला आहे. हा संसर्ग पसरु नये म्हणून लिनीचे अंत्यविधी न करता विद्युत दाहिनीमध्ये तिला शेवटचा निरोप देण्यात आला.
“मुलांची काळजी घे”, लिनीचे नवऱ्याला पत्र
‘निपाह’ व्हायरसची लागण झाल्याचे कळताच लिनीने तिच्या नवऱ्यासाठी एक पत्र लिहून ठेवलं. ज्यात ती म्हणते की, “आपली भेट होईल असे वाटत नाही.पण मुलांची काळजी घे.जसे माझे वडिल मला एकटे सोडून निघून गेले तसा तू जाऊ नकोस. मुलांना तुझ्यासोबत घेऊन जा”
काय आहे ‘निपाह’ व्हायरस
वटवाघळाच्या माध्यमातून हा व्हायरस माणसांमध्ये आल्याचे समजते आहे. १९९८ मध्ये मलेशियात या रोगाचा विषाणू पहिल्यांदा डुकरांमध्ये आढळला. त्यानंतर सिंगापूर, सिलिगुरी, बांग्लादेश, पश्चिम बंगाल असा प्रवास करत आता हा विषाणू केरळमध्ये पोहोचला आहे.