नवी दिल्ली : मणिपूर महिनाभरानंतर पुन्हा एकदा हिंसाचार उसळला आहे. काँग्रेस खासदार जयराम रमेश यांनी भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. त्यांनी म्हटले की, कलम 355 लागू होऊनही राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था आणि प्रशासन पूर्णपणे कोलमडले आहे. याशिवाय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मणिपूर हिंसाचार प्रकरणी शांततेचे एकही आवाहन जारी केले नसल्यामुळे काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळ मंगळवारी (30 मे) राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेणार असल्याचेही खर्गे यांनी सांगितले. (Congress MP Jairam Ramesh will attack the central government in the case of Manipur violence)
जयराम रमेश यांनी ट्विटरच्या माध्यमातून तीन आठवड्यांपूर्वी मणिपूरमध्ये झालेल्या हिंसाचारापासून राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था बिघडल्याचा आरोप भाजपवर केला. त्यांनी ट्वीटमध्ये म्हटले की, मणिपूर जळायला लागल्याच्या 25 दिवसांनंतर केंद्रीय गृहमंत्र्यांच्या इंम्फाळच्या बहुप्रतिक्षित दौऱ्याच्या पूर्वसंध्येला परिस्थिती वाईटाकडून वाईटाकडे वळली आहे. कलम 355 लागू असूनही राज्यात कायदा-सुव्यवस्था आणि प्रशासन पूर्णपणे कोलमडले आहे. पंतप्रधानांना स्वतःच्या राज्याभिषेकाचे वेड असताना ही एक भयानक शोकांतिका उघडकीस आली आहे. त्यांनी जारी केलेले शांततेचे एकही आवाहन नाही किंवा समुदायांमध्ये पुन्हा विश्वास निर्माण करण्याचा कोणताही प्रयत्न झालेला नाही. त्यामुळे काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळ मंगळवारी सकाळी माननीय राष्ट्रपतींची भेट घेणार आहे.
25 days after Manipur started burning, things have turned from bad to worse on the eve of the long-awaited visit of the Union Home Minister to Imphal. Despite Article 355 being imposed there’s a total and complete breakdown of law & order and administration in the state.
It’s…
— Jairam Ramesh (@Jairam_Ramesh) May 28, 2023
सुरक्षा कर्मचार्यांच्या हालचालीत अडथळा आणू नये
राज्य सचिवालयात प्रसारमाध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री एन. बिरेन सिंग म्हणाले की, राज्यात शांतता प्रस्थापित करण्यासाठी सुरक्षा दलांनी कारवाई सुरू केल्यापासून घरांची जाळपोळ आणि लोकांवर गोळीबार करणाऱ्या सुमारे 40 सशस्त्र अतिरेक्यांना मारण्यात आले आहे. मुख्यमंत्र्यांनी दावा केला की, अलीकडच्या काळात झालेल्या चकमकी समुदायांमध्ये नसून कुकी अतिरेकी आणि सुरक्षा दलांमध्ये होत्या. सशस्त्र अतिरेक्यांनी एके-47, एम-16 आणि स्निपर रायफलने लोकांवर गोळीबार केल्याची घटना घडली आहे. त्यामुळे सुरक्षा दलांनी प्रत्युत्तरादाखल या दहशतवाद्यांना लक्ष्य केले आहे. मुख्यमंत्री सिंग यांनी लोकांना सुरक्षा कर्मचार्यांच्या हालचालीत अडथळा आणू नये तसेच सरकारवर विश्वास ठेवा आणि सुरक्षा दलांना पाठिंबा देण्याचे आवाहन केले आहे. ते म्हणाले की, आम्ही इतके दिवस त्रास सहन केला आहे आणि आम्ही कधीही राज्याचे विघटन होऊ देणार नाही. नागरिकांच्या हत्या, मालमत्तेचे नुकसान आणि घरांची जाळपोळ करणाऱ्या अनेक कुकी अतिरेक्यांना जाट रेजिमेंटने अटक केली असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
3 मे रोजी पहिली हिंसाचारी घटना
अनुसूचित जमाती (ST) दर्जा मिळावा या मागणीसाठी मेईतेई समुदायाने 3 मे रोजी पहाडी जिल्ह्यांमध्ये ‘आदिवासी एकता मार्च’ काढल्यानंतर मणिपूरमध्ये झालेल्या जातीय संघर्षात 75 हून अधिक लोक मारले गेले होते. यानंतर आरक्षित वनजमिनीतून कुकी ग्रामस्थांना बेदखल केल्याने तणाव आधीच वाढला. मणिपूरच्या लोकसंख्येच्या सुमारे 53 टक्के मेईटी असून यापैकी बहुतेक इंफाळ खोऱ्यात राहतात. राज्यातील सामान्य स्थिती पूर्ववत करण्यासाठी अर्धसैनिक दलांव्यतिरिक्त, लष्कर आणि आसाम रायफल्सच्या सुमारे 140 कंपन्या, ज्यात 10,000 हून अधिक जवानांना तैनात करावे लागले होते.