पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सुरक्षेमध्ये मोठी चूक पंजाबमध्ये झाली. मोदींची पंजाबमधील फिरोजपूरमध्ये मोठी रॅली होणार होती. परंतु आंदोलक शेतकऱ्यांनी भररस्त्यात मोदींचा ताफा रोखला. १५ ते २० मिनिटे उड्डाणपूलावर मोदींचा ताफा अडकला होता. मोदींच्या पंजाबच्या दौऱ्याची कल्पना असतानाही इतकी मोठी चूक झाल्यामुळे भाजपकडून आता मुख्यमंत्री चरणजीत सिंग चन्नी यांच्या राजीनाम्याची मागणी होत आहे. तसेच याचे पडसाद संपूर्ण भारतात उमटत असून भाजप नेत्यांकडून तीव्र प्रतिक्रिया येत आहेत. याबाबत आता स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भटिंडा विमानतळावर पोहोचल्यानंतर प्रतिक्रिया दिली आहे.
एएनआय या वृत्तसंस्थेशी बातचित करताना अधिकाऱ्यांनी पंतप्रधान मोदी या चुकीमुळे खूप नाराज असल्याचे सांगितले. पंतप्रधान नरेंद्र मोदी भटिंडा विमानतळावर पोहोचल्यानंतर तेथील कर्मचाऱ्यांना म्हणाले की, मी विमानतळावर जिवंत पोहोचलो, याबाबत मुख्यमंत्र्यांचे आभार सांगा.
Officials at Bhatinda Airport tell ANI that PM Modi on his return to Bhatinda airport told officials there,“Apne CM ko thanks kehna, ki mein Bhatinda airport tak zinda laut paaya.” pic.twitter.com/GLBAhBhgL6
— ANI (@ANI) January 5, 2022
नक्की काय घडले?
आज पंतप्रधान नरेंद्र मोदी पंजाबमध्ये भाजपच्या निवडणूक प्रचार सुरू करण्यास जात होते. सकाळपासून फिरोजपूरमध्ये गर्दी होण्यास सुरुवात झाली होती. परंतु काही शेतकरी आंदोलकांमुळे मोदींची रॅली रद्द होईल याबाबत कोणाला अंदाज नव्हता. मोदी भटिंडाला पोहोचले होते. येथून ते हेलिकॉप्टरमधून हुसैनीवालामधील राष्ट्रीय शहीद स्मारक येथे जाणार होते. परंतु हवामान चांगले नसल्यामुळे मोदींनी २० मिनिटे वाट पाहिली. परंतु हवामानात कोणतीही सुधारणा झाली नाही. त्यामुळे मोदींनी रस्ते मार्गाने राष्ट्रीय शहीद स्मारकला जाण्याचा निर्णय घेतला. २ तास या ठिकाणी जाण्यासाठी लागणार होते. पंजाब डीजीपीकडून सुरक्षा व्यवस्थेची पुष्टी केल्यानंतर मोदी रस्ते मार्गाने पुढे निघाले. राष्ट्रीय शहीद स्मारकाहून ३० किमी अगोदर मोदींचा ताफा जेव्हा उड्डाणपुलावर पोहोचला, तेव्हा काही आंदोलकांनी मोदींचा ताफा अडवला. त्यामुळे १५ ते २० मिनिटे मोदी उड्डाणपुलावर अडकले. ही पंतप्रधान मोदींच्या सुरक्षेमध्ये मोठी चूक असल्याचे म्हटले जात आहे. याबाबत गृहमंत्रालयाने निवेदन जारी करून पंजाब सरकारकडून याबाबत सविस्तर अहवाल मागवला आहे.
हेही वाचा – Punjab: संतप्त शेतकऱ्यांनी अडवला मोदींचा ताफा, सुरक्षेत मोठी चूक; फिरोजपुर रॅली रद्द