नवी दिल्ली : एकीकडे लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असतानाच दुसरीकडे, दिल्ली काँग्रेसमधील संघर्ष अधिक तीव्र झाला आहे. प्रदेशाध्यक्ष अरविंदरसिंग लवली यांच्या राजीनाम्यानंतर पक्षात दोन गट पडल्याचे समोर आले आहे. पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि माजी आमदार आसिफ मोहम्मद यांना धक्काबुक्की करण्यात आली. लवली यांच्या समर्थकांनी हा प्रकार केल्याचा आरोप आहे. (Politics: After the resignation of the Delhi state president, two factions clashed)
अरविंदरसिंग लवली यांनी आपला प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा प्रसार माध्यमांमध्ये दिल्याबद्दल माजी आमदार आसिफ यांनी प्रश्न उपस्थित केला. पक्षात मतभेद असू शकतात. दिल्लीत प्रदेश काँग्रेसचा कारभार तुमच्या इच्छेप्रमाणे चालत नसले, असे असू शकते. लवली नाखूश होते आणि त्यांना राजीनामा द्यायचा होता, तर त्यांनी शांतपणे आपला राजीनामा पक्षाचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्याकडे सोपवला असता. या राजीनाम्यामागची कारणे दिली आहेत आणि ते पत्र त्यांनी माध्यमांना दिले आहे. तुमच्या हेतू चुकीचा नव्हता तर, तुम्ही खर्गे यांच्याकडे शांतपणे राजीनामा दिला असता आणि परत आला असता. पक्षाने तुमचे मत वळविण्याचा प्रयत्न केला असता, असे आसिफ मोहम्मद यांनी पत्रकारांना सांगितले.
#WATCH | Delhi: As Arvinder Singh Lovely resigns as Delhi Congress chief, former Congress MLA Asif Mohammad Khan says, “There might be differences in the party…If Lovely was disappointed, wanted to resign then he would have silently accorded his resignation to Mallikarjun… pic.twitter.com/e2eNLY1kg3
— ANI (@ANI) April 28, 2024
ही अंतर्गत बाब आहे, पण लवली यांनी ज्या पद्धतीने माध्यमांना पत्र दिले त्याचा थेट फायदा भाजपाला होत आहे. त्यांनी गाजावाजा न करता, शांतपणे हे करायला पाहिजे होते. एक-दोन दिवसांत हर्ष मल्होत्रा यांच्या जागी लवली यांना उमेदवार घोषित केले जाईल, असे मी ठामपणे सांगतो, असे ते म्हणाले. आसिफ मोहम्मद मीडियाशी बोलत असताना लवली यांचे कथित समर्थक तेथे पोहोचले आणि त्यांना धक्काबुक्की करण्यास सुरुवात केली. गर्दी पाहून आसिफ तेथून निघाले, मात्र काही लोकांनी लवली यांच्या समर्थनार्थ घोषणाबाजी करत आसिफ मोहम्मद यांचा पाठलाग केला.
लवली यांनी राजीनामा दिल्याचे रविवारी समोर आल्यानंतर पक्षात दोन गट पडले आहेत. संदीप दीक्षित यांच्यासह काही नेते लवली यांचे कौतुक करत असताना दिसत होते. तर, त्यांच्या राजीनाम्याच्या निर्णयावर आणखी एका गटाने प्रश्न उपस्थित करण्यास सुरुवात केली आहे. आम आदमी पक्षाशी केलेली हातमिळवणी तसेच कन्हैया कुमार – उदित राज यांच्यासारख्या उमेदवारांची निवड यावर प्रश्न उपस्थित करत लवली यांनी प्रदेशाध्यक्षपद सोडले आहे.