आसाममध्ये काँग्रेसला एका मोठा धक्का बसला आहे. आसाम काँग्रेसचे माजी अध्यक्ष रिपून बोरा रविवारी अखिल भारतीय तृणमूल काँग्रेसमध्ये सामील झाले आहेत. टीएमसीचे राष्ट्रीय सरचिटणीस अभिषेक बॅनर्जी यांनी माजी राज्यसभा खासदाराला पक्षात सामील करून घेतले. बोरा यांनी रविवारी प्रदेश काँग्रेसमधील गटबाजीचे कारण देत पक्षाचा राजीनामा दिला.
लोकसभा निवडणुकीसाठी टीएमसीची तयारी सुरु
माजी राज्यसभा सदस्य रिपून बोरा हे आसाममध्ये काँग्रेसचे अध्यक्षही राहिले आहेत. रिपुन बोरा यांनी काँग्रेसमधून राजीनामा दिल्यानंतर लगेचच टीएमसीने त्यांच्या ट्विटर हँडलवरून त्यांचे आणि अभिषेक बॅनर्जी यांचे फोटो ट्विट केले. 2024 च्या लोकसभा निवडणुकीच्या TMC आधीच तयारीला लागली आहे. भाजपला मात देण्यासाठी ममता यांचा पक्ष अनेक राज्यांमध्ये आपली व्याप्ती वाढवण्याचा प्रयत्न करत आहे.
It gives us immense joy to welcome Shri @ripunbora, who joined the @AITCofficial family in the presence of our National General Secretary Shri @abhishekaitc pic.twitter.com/qfJka4PVIq
— All India Trinamool Congress (@AITCofficial) April 17, 2022
आसाममध्ये काँग्रेसला मोठा धक्का
यापूर्वी आसामच्या सुप्रसिद्ध नेत्या आणि सध्याच्या राज्यसभा खासदार सुष्मिता देव यांनीही काँग्रेस सोडून गेल्या वर्षी टीएमसीमध्ये प्रवेश केला होता. आता आसामचे बडे नेते आणि माजी मंत्री रिपुन बोरा यांच्या राजीनाम्यानंतर राज्यात काँग्रेस आणखी कमकुवत होताना दिसत आहे. राज्यातील निवडणुकीतील पराभवाची नैतिक जबाबदारी स्वीकारत रिपुन यांनी स्थानिक युनिट प्रमुख पदाचा राजीनामा दिला.
आसाममध्ये काँग्रेसचा संघर्ष सुरू असताना टीएमसी राज्यात पाय रोवण्यासाठी सातत्याने प्रयत्न करत आहे. आसाममध्ये टीएमसी सक्रिय होताना दिसत आहे. या क्रमाने राज्यातील टीएमसी कार्यालय पुढील आठवड्यापर्यंत तयार होण्याची अपेक्षा आहे. लोकसभा निवडणुकीसाठी तृणमूलची नजर ईशान्येतील आसाम, त्रिपुरा आणि मेघालयकडे आहे.
टीएमसी ईशान्य भारतात आपल्या पक्षाचे अस्तित्व वाढवण्याचा प्रयत्न करत आहे. अशा परिस्थितीत बोरा यांच्या आगमनाने टीएमसीला मोठ्या आशा आहेत. आसाम, मेघालय आणि त्रिपुरामध्ये भाजपची जागा घेण्यासाठी टीएमसी प्रयत्न करत आहे. एकेकाळी काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या ईशान्येकडील राज्यांतील नेत्यांचे पक्षांतर हा राष्ट्रीय पक्षासाठी मोठा धक्का आहे.