गेल्या २ ते ३ वर्षांपासून लंडनमध्ये पसार झालेला भारतीय उद्योजक विजय माल्ल्याला अखेर भारतीय न्यायालयाने फरार घोषित केलं आहे. त्याला फरार घोषित करण्याची विनंती इडी अर्थात अंमलबजावणी संचलनालयाने केली होती. पीएमएलए न्यायालयाला केली होती. सुनावणीनंतर इडीची ही विनंती न्यायालयाने मान्य केली आहे. त्यामुळे नव्या फरार आर्थिक गुन्हे कायद्यानुसार विजय माल्ल्याला फरार आर्थिक गुन्हेगार घोषित करण्यात आले आहे. त्यामुळे आता विजय माल्ल्याची भारतातली संपत्ती जप्त करण्याचा इडीचा मार्ग मोकळा झाला आहे. नव्या कायद्यानुसार फरार आर्थिक गुन्हेगार ठरलेला विजय माल्ल्या पहिलाच गुन्हेगार आहे.
प्रत्यार्पण कधी होणार?
भारतीय बँकांचे सुमारे ९ हजार कोटी रुपयाचे कर्ज बुडवून माल्ल्या गायब झाला होता. तेव्हापासून भारतीय तपास यंत्रणा इडी विजय माल्ल्याच्या मागावर आहे. आत्तापर्यंत लंडनकडून माल्ल्याच्या प्रत्यार्पणामध्ये कायद्याच्या आधारे आडकाठी आणली जात होती. आता मात्र तिथल्या कोर्टानेच माल्ल्याच्या प्रत्यार्पणाला हिरवा कंदील दिला आहे. मात्र, आता सर्व सोपस्कार पूर्ण करून माल्ल्याचं प्रत्यार्पण नक्की कधी होणार? याती प्रतिक्षा भारतीय तपास यंत्रणांना आहे.
माल्ल्याची मागणी फेटाळली
दरम्यान, विजय माल्ल्याने भारताच्या हवाली होण्यासाठी मुदतवाढ मिळावी अशी मागणी न्यायालयाकडे केली होती. ही मागणी देखील न्यायालयाने फेटाळली आहे. त्यामुळे आता माल्ल्या चांगलाच अडचणीत सापडला आहे. नुकतेच वेस्टमिन्स्टर मॅजिस्ट्रेट कोर्टानं विजय माल्ल्याचं भारताकडे प्रत्यार्पण करण्याचे आदेश दिले होते.
आता हा कुठून पैसे देणार? – विजय माल्ल्या म्हणतोय ‘हे घ्या पैसे’…
मालमत्ता जप्त होणार
माल्ल्याला फरार आर्थिक गुन्हेगार घोषित करण्यात आल्यामुळे आता त्याची मालमत्ता जप्त करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. अशा गुन्हेगारांची मालमत्ता तातडीने जप्त केली जाते. त्यांच्याविरोधात अटक वॉरंट देखील जारी करण्यात येते.