घरसंपादकीयदिन विशेषथोर राष्ट्रभक्त लालबहादूर शास्त्री

थोर राष्ट्रभक्त लालबहादूर शास्त्री

Subscribe

लालबहादूर शास्त्री हे भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील निष्ठावान कार्यकर्ते, थोर राष्ट्रभक्त आणि भारताचे दुसरे पंतप्रधान (९ जून १९६४-११ जानेवारी १९६६) होते. त्यांचा जन्म २ ऑक्टोबर १९०४ रोजी बनारसजवळील मोगलसराई येथे झाला. हरिश्चंद्र हायस्कूलमध्ये ते मॅट्रिकला असताना महात्मा गांधींनी असहकाराची चळवळ सुरू केली (१९२१). शास्त्रींनी शाळा सोडली व महात्मा गांधींच्या विचारसरणीकडे ते आकृष्ट झाले. पुढे त्यांना महात्मा गांधींचा सहवास लाभला व ते पूर्णतः गांधीवादी बनले. त्यांनी महत् कष्टाने काशी विद्यापीठातून तत्त्वज्ञान या विषयात पहिल्या वर्गात शास्त्री ही पदवी मिळविली (१९२५). विद्यार्थिदशेत डॉ. भगवानदास, गोपालशास्त्री या अध्यापकांचा आणि नंतर पुरुषोत्तमदास टंडन व लाला लजपत राय यांच्या त्यांच्यावर प्रभाव पडला. लाला लजपत राय यांनी स्थापिलेल्या ‘सर्व्हंट्स ऑफ द पीपल’ या संस्थेचे ते १९२५-२६ मध्ये आजीव सेवक झाले आणि अलाहाबादेत त्यांनी कायमचे वास्तव्य केले. त्यांनी सामाजिक क्षेत्रातील संघटनांतून बहुविध पदांवर काम केले. स्वातंत्र्य चळवळीत त्यांना सात वेळा अटक होऊन नऊ वर्षे कारावास भोगावा लागला. १९४२ च्या चळवळीत भूमिगत राहून त्यांनी कार्य केले; पण पुढे त्यांना अटक झाली. तुरुंगात त्यांनी कांट, हेगेल, रसेल, हक्स्ली इत्यादी विचारवंतांच्या ग्रंथांचे परिशीलन केले. मादाम क्यूरीच्या चरित्राचे त्यांनी हिंदीत भाषांतर केले. त्यांचे काही स्फुटलेख अप्रकाशित राहिले आहेत. त्यांनी काही महिने उत्तर प्रदेशाच्या इंटरमीजिएट बोर्डावर तसेच हिंदी समितीचे संयोजक म्हणूनही काम केले. अशा या थोर राष्ट्रभक्ताचे ११ जानेवारी १९६६ रोजी निधन झाले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -