बॉलिवूड अभिनेत्री कियारा अडवाणी व कार्तिक आर्यन यांचा ‘सत्यप्रेम की कथा’ चित्रपट 29 जून रोजी प्रदर्शित झाला असून या चित्रपटाला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे. बॉक्स ऑफिसवरही चित्रपट चांगली कमाई करताना दिसत आहे. मात्र, आता अशातच दुसरीकडे सेन्सॉर बोर्डाने या चित्रपटात काही बदल करण्याचे आदेश दिले आहेत.
सेन्सॉर बोर्डाने ‘सत्यप्रेम की कथा’च्या निर्मात्यांना चित्रपटात एकूण सात बदल करण्यास सांगितले आहेत. यामध्ये ‘घपा-घप’ या शब्दाचाही समावेश आहे. सेन्सॉर बोर्डाने निर्मात्यांना हा शब्द म्यूट करण्यास सांगितला असून याआधी देखील संजय दत्तच्या ‘संजू’ बायोपिक चित्रपटात ‘घपा-घप’ शब्द पहिल्यांदा वापरण्यात आला होता. पण त्यावेळी हा शब्द हटवण्यात आला नव्हता. त्यामुळे सध्या नेटकरी सोशल मीडियावर नाराजी व्यक्त करत आहेत.
या व्यतिरिक्त सेन्सॉर बोर्डाने ‘डर्टी माइंड’ हा शब्द चित्रपटात म्यूट करण्यात आला आहे. तसेच ‘गुज्जु पटाका’ या गाण्यातील चेलियां हा शब्द हटवून त्याऐवजी ‘राधे की सहेलियां’ आणि ‘एक शॉट’ऐवजी ‘एक बार’ असे शब्द वापरण्याचे सुचवले आहे. याशिवाय चित्रपटातून ‘फिनाइल’चे लेबल काढावे आणि चित्रपटात दिलेल्या बलात्काराच्या आकड्यांचा पुरावा सादर करण्यास सेन्सॉर बोर्डाने निर्मात्यांना सांगितले होते. नमूद केलेल्या या बदलांनंतर या चित्रपटाला सेन्सॉर बोर्डाकडून प्रमाणपत्र देण्यात आले आहे.