'भाई व्यक्ती की वल्ली' चित्रपटातील काही प्रसंगावर 'भारतरत्न' पंडित भीमसेन जोशी आणि गानहिरा हिराबाई बडोदेकर यांच्या कुटुंबीयांनी आक्षेप नोंदनला आहे.
‘भाई व्यक्ती की वल्ली’ चित्रपटातील काही प्रसंगावर ‘भारतरत्न’ पंडित भीमसेन जोशी आणि गानहिरा हिराबाई बडोदेकर यांच्या कुटुंबीयांनी आक्षेप नोंदनला आहे. चित्रपटात या दोन्ही दिग्गज कलाकारांचे चुकीचे प्रसंग दाखविण्यात आले असल्याचा आक्षेप त्यांच्या कुटुंबीयांनी घेतला आहे. चित्रपटात दाखवण्यात आलेल्या या चुकीच्या प्रसंगांबाबत निर्मात्यांनी जाहीर माफी मागावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे.
मद्यपान आणि वयाच्या मुद्द्यावर आक्षेप
‘भाई…’ चित्रपटातील एका प्रसंगात हिराबाई यांच्या घरी पु.ल., वसंतराव देशपांडे आणि पंडित भीमसेन जोशी दारू पित बसले आहेत, असं दाखवण्यात आलं आहे. ‘हिराबाईंच्या घरी हे तिघं मद्यपान करत असल्याचा कुठलाही प्रसंग कधीही घडला नव्हता’, असं म्हणत त्यांच्या कुटुंबियांनी आक्षेप घेतला आहे. हिराबाई आणि पु.लं.देशपांडे यांच्यामध्ये एका पिढीचे अंतर होते. मात्र, चित्रपटात या दोघांच्या वयातील अंतर खूपच कमी दाखवण्यात आल्याचं कुटुंबियांनी म्हटलं आहे. तसंच पुलंनी चित्रपटात हिराबाईंचा ‘एकेरी’ उल्लेख केलेला दाखवणं हेही चुकीचं असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. हिराबाई आणि भीमसेन जोशींच्या चित्रपटातील चुकीच्या सादरीकरणामुळे लोकांध्ये त्यांच्याविषयी आणि त्यांच्या कलेविषयी चुकीचा समज पसरेल, अशी शक्यता त्यांच्या कुटुंबियांनी वर्तवली आहे.
आता चित्रपटाचे निर्माते यावर काय प्रतिक्रिया देतात हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. दरम्यान, महेश वामन मांजरेकर दिग्दर्शित ‘भाई- व्यक्ती की वल्ली’ या चित्रपटाचा उत्तरार्ध ८ फेब्रुवारी रोजी प्रदर्शित होणार आहे.