फन्ने खान, कारवां आणि मुल्क हे तीन बॉलीवूडपट या शुक्रवारी एकत्रच प्रदर्शित होत आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा Box Office वर बॉलीवूड की टक्कर पाहायला मिळणार आहे. आता या तीन चित्रपटांमधला कोणता चित्रपट जबरदस्त ओपनिंग करतोय? याकडे सगळ्यांचं लक्ष लागून राहिलं आहे. मात्र, असं असलं तरी तिन्ही चित्रपटांची प्रेक्षक तितक्याच आतुरतेने वाट पाहत आहेत. अतुल मांजरेकर दिग्दर्शित फन्ने खान हा चित्रपट २००० मध्ये आलेल्या एव्हरी बडीज या प्रसिद्ध चित्रपटावर आधारित आहे. यामध्ये अनिल कपूर, ऐश्वर्या राय बच्चन आणि राजकुमार राव यांच्या मुख्य भूमिका आहेत. २ तास ९ मिनिटाच्या या चित्रपटासाठी ३० कोटी रुपयांचा खर्च आला आहे. ऐश्वर्या राय बच्चन आणि एव्हरग्रीन अभिनेते अनिल कपूर एकत्र झळकणार असल्यामुळे फन्ने खान सिनेमची सध्या सर्वाधिक चर्चा पाहायला मिळत आहे. फन्ने खानच्या निर्मात्यांना चित्रपटाची पहिल्या दिवसाची कमाई ३ ते ५ कोटी असेल, अशी अपेक्षा आहे.
फन्ने खानला टक्कर ‘या’ दोघांची
फन्ने खान चित्रपटाची सर्वाधिक चर्चा असली तरी त्याला टक्कर देण्यासाठी, ‘कारवां’ आणि ‘मुल्क’ हे २ चित्रपटही स्पर्धेत आहेत. शाहरुख खानच्या ‘रावण’ चित्रपटाचे दिग्दर्शक अनुभव सिन्हा यांचा ‘मुल्क‘ हा दुसरा चित्रपट आहे. या चित्रपटात तापसी पन्नू आणि ऋषि कपूर यांच्या मुख्य भूमिका आहेत. याशिवाय प्रतिक बब्बर, आशुतोष राणा आणि रजत कपूर हे तिघंही या चित्रपटांत झळकणार आहेत. निर्मात्यांच्या अपेक्षेनुसार, १५ करोडचं बजेट असलेला ‘मुल्क’ पहिल्या दिवशी १ ते ३ करोडची कमाई करेल.
तर दुसरीकडे आकर्ष खुराना दिग्दर्शित कारवां चित्रपटही या स्पर्धेत आहे. या चित्रपटात इरफान खान मुख्य भूमिकेत झळकणार आहे. इरफान सध्या लंडनमध्ये कॅन्सरवर उपचार घेत आहे. याच कारणामुळे हा चित्रपट गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत राहिला आहे. दरम्यान इरफानचे चाहते ‘कारवां’ला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद देतील, अशीही चर्चा आहे. इरफान शिवाय चित्रपटात दिलकेर सलमान आणि मिथिला पालकर हे कलाकारही मुख्य भूमिकेत झळकणार आहेत. १ तास ५५ मिनिटांच्या या चित्रपटाला पहिल्या दिवशी देशभरातून २ करोडची ओपनिंग लागेल, अशी निर्मात्यांना आशा आहे.
‘पुष्पक विमान’ही घेणार उड्डाण
सुबोध भावे लिखित आणि वैभव चिंचाळकर दिग्दर्शित मराठी चित्रपट ‘पुष्पक विमान‘, उद्याच रिलीज होणार आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने सुबोध भावे आणि मोहन जोशी हे पहिल्यांदाच एकत्र दिसणार आहेत. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांसमोर आला आहे. सोशल मीडियावर ट्रेलरला प्रेक्षकांची चांगली पसंती मिळली आहे. चित्रपटात मोहन जोशी, सुबोध भावे हे प्रमुख भुमिकेत दिसणार आहेत. त्याचप्रमाणे गौरी किरण या चित्रपटाच्या निमित्ताने मराठी चित्रपटसृष्टीत अभिनय क्षेत्रात पदार्पण करत आहे. त्याचबरोबर गायक राहुल देशपांडे एका खास भूमिकेतून प्रेक्षकांसमोर येणार आहेत.