पणजी : गोव्यामध्ये 54 व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाला सुरुवात झाली आहे. जगभरातील चित्रपट प्रेमी या सोहळ्यासाठी गोव्यात दाखल झाले आहेत. 20 नोव्हेंबर ते 28 नोव्हेंबर या कालावधीत हा सोहळा पार पडणार आहे. पण आता या कार्यक्रमात एका नव्या वादाला सुरुवात झाली आहे. इफ्फी महोत्सवामध्ये ‘पीकॉक’ नावाचे दैनिक प्रसिद्ध करण्यात येते. पण यंदाच्या दैनिकामध्ये गोव्यातील दिवंगत लेखक व भाजपाचे माजी आमदार विष्णू सूर्या वाघ यांची जातिभेदावर भाष्य करणारी ‘सेक्युलर’ कविता न छापल्यामुळे एका नव्या वादाला तोंड फुटले आहे. रविवारी (ता. 26 नोव्हेंबर) हे दैनिक प्रसिद्ध करण्यात आले, या दैनिकामध्ये कलाकार सिद्धेश गौतम यांनी तयार केलेले दोन पानी चित्रण छापण्यात आले आहे. मात्र, त्यासह जी कविता छापली जाणार होती, ती शनिवारी अचानक वगळण्यात आली. ज्यामुळे याबाबत आता संताप व्यक्त करण्यात येत आहे. (FFI New controversy started due to IFFI function, anger over non-printing of former MLA’s poem)
हेही वाचा – Jagdeep Dhankhar : उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी पंतप्रधानांना दिली ‘ही’ उपाधी
पीकॉक दैनिकात कविता छापण्यात न आल्याने याबाबत सिद्धेश गौतम यांनी प्रचंड नाराजी व्यक्त केली आहे. तर दिवंगत वाघ यांचे पुतणे कौस्तुभ नाईक यांनी याबाबत बोलताना सांगितले आहे की, हा सेन्सॉरशिप लादण्याचा प्रकार आहे. गोवा सरकारतर्फे एंटरटेन्मेंट सोसायटी ऑफ गोवा (ESG) ही संस्था इफ्फीचे आयोजन करीत असते. ईएसजीने सांगितले की, कविता वगळण्याचा निर्णय संपादकीय स्तरावर घेण्यात आला. ईएसजीकडे पीकॉकचे प्रकाशन करण्याचीही जबाबदारी आहे. तर, रविवारच्या अंकात विष्णू सूर्या वाघ यांची कविता छापणार नसल्याचे मला सांगण्यात आले. वाघ यांची ‘सेक्युलर’ कविता काळजीपूर्वक निवडण्यात आली होती. शहरी आणि ग्रामीण भागातील अनेकांना रोजच्या जीवनात भेडसावणाऱ्या जातिभेदाच्या घटनांवर या कवितेतून भाष्य करण्यात आले होते. मलाही माझ्या आयुष्यात अशा प्रसंगांचा अनेकदा सामना करावा लागला आहे. एक विद्यार्थी म्हणून नाही तर कलाकार म्हणूनही मला अडचणींचा सामना करावा लागला, असे म्हणत चित्रकार सिद्धेश गौतम यांनी ही पोस्ट इन्स्टाग्रामवर शेअर करत नाराजी व्यक्त केली आहे.
याबाबत ईएसजीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी अंकिता मिश्रा यांच्याकडून स्पष्टीकरण देण्यात आले आहे. कविता न छापण्याचा निर्णय संपादकीय विभागाने घेतला होता आणि तो सर्जनशील कारणांनी घेतला होता. त्याचा कवितेच्या आशयाशी काहीही संबंध नाही. पीकॉक हा सुरुवातीपासूनच कलात्मक स्वातंत्र्याचा पुरस्कर्ता राहिला आहे आणि भविष्यातही आम्हाला कलेला प्राधान्य देण्याचा प्रयत्न करायचा आहे, असे त्यांच्याकडून सांगण्यात आले आहे.
पण, दिवंगत वाघ यांचे पुतणे कौस्तुभ यांनी यांवर प्रतिक्रिया देत सांगितले की, काही दिवसांपूर्वी ‘पीकॉक’कडून वाघ यांच्या सुदीरसुक्त या कवितासंग्रहातील कविता इंग्रजी भाषांतर करून त्यांना हवी आहे, असा त्यांना निरोप मिळाला. “त्यांनी मला काही कविता निवडण्यास सांगितल्या. मी त्यांना विचारले की, त्यांच्या मनात काही विशिष्ट कविता आहे का? ‘द पीकॉक’च्या रविवारच्या आवृत्तीत जातीविरोधी कलाकार सिद्धेश गौतम यांनी वाघ यांच्यावर चितारलेल्या दोन पानांच्या डिझाईनमध्ये सेक्युलर ही कविता छापण्याचे निश्चित झाले होते. मात्र, शनिवारी ईसीजीमधील अधिकाऱ्यांनी माझ्याशी संपर्क साधला आणि कळवले की, सदर कविता छापली जाणार नाही. कविता छापली जाणार नसली तरी गौतम यांनी डिझाइन केलेले चित्र मात्र प्रिंट करण्यात आले. गौतमनेही सांगितले की, कविता न छापण्याचे कोणतेही कारण त्याला कळविण्यात आले नाही. कदाचित वाघ यांच्या कवितेमधील व्यवस्थेविरोधातील आवाज कविता वगळण्याचे एक कारण असू शकते. महत्त्वाची बाब म्हणजे दिवंगत विष्णू सूर्या वाघ हे ईसीजीचे माजी उपाध्यक्ष होते. ज्यांचे 2019 मध्ये निधन झाले.