अफगाणिस्तान आणि भारत यातील सीमेवर सारागढी हे एक स्थळ आहे. दोन देशात सलोखा निर्माण करण्याच्या दृष्टीने साधल्या जाणार्या संवादाचे हे एक ठिकाण. अफगाणिस्तानच्या रितीरिवाजाप्रमाणे जाहीरपणे स्त्रीची हत्या केली जाते. इंग्रजांच्या सैन्यात हवालदार म्हणून इशर सिंग सेवेत आहे. तो विरोध करतो आणि इथूनच युद्धाला सुरुवात होते. इंग्रज अफगाणिस्तानच्या विरोधात असले तरी भारतीय सैनिकांना मानाची वागणूक दिली जात नव्हती , याची सल इशरच्या मनात होती. त्याला विरोध आणि भारतीय सरदारजी लढवय्ये आहेत हे दाखवण्याची हीच संधी आहे , अशा हेतूने भारतीय एकवीस सैनिकांनी दिलेली झुंज म्हणजे ‘केसरी’ चित्रपट सांगता येईल.
अनुराग सिंग याने या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. इशरची मुख्य भूमिका अक्षय कुमारने तर त्याच्या पत्नीची भूमिका परिणीती चोप्रा हिने साकार केली आहे. हे दोन चेहरे ओळखीचे सोडले तर सर्वच कलाकार हे नवोदित आणि रंगभूमीशी निगडित आहेत. इशरचा त्याग, बलिदान आणि धर्माबरोबर देशाबद्दलचा अभिमान या सार्या गोष्टी व्यक्तिमत्त्वात आणण्यात अक्षय कुमार यशस्वी झाला आहे. साधारण 1897 या कालखंडातील ही कथा आहे. त्यामुळे त्यावेळची यंत्रणा, वेशभूषा, रंगभूषा आणि माणसाची जीवनशैली यांचे अचूक दर्शन या चित्रपटात घडवलेले आहे. फारकाही पाहिल्याचे समाधान देत नाही, परंतु केसरी रंगाचा स्वाभिमान असणारा एक युवक कोणत्या थराला जाऊ शकतो याचे दर्शन एकट्या अक्षय कुमारने वन मॅन शो म्हणावा असे घडवलेले आहे.