घरफिचर्ससारांशभावनिक छळाचे बळी!

भावनिक छळाचे बळी!

Subscribe

आपण अनेकदा व्यक्तीवर मग ते स्त्री असो पुरुष असो, मुलं असोत, वयोवृद्ध असो त्यांच्यावर होणार्‍या अत्याचार, अन्याय, पिळवणूक, ब्लॅकमेलिंग, गृहीत धरणे यावर बोलत असतो. हा अत्याचार जसा शारीरिक, मानसिक, आर्थिक असू शकतो तसाच तो भावनिक पण असतो आणि तो सहजासहजी लक्षात येतो का? या विषयावर आजच्या लेखात प्रकाशझोत टाकणार आहोत.

-मीनाक्षी जगदाळे

एखाद्याला मारणे, शारीरिक इजा पोहचवणे, एखाद्याची आर्थिक फसवणूक करणे, कोणाचे मानसिक खच्चीकरण करणे, टोमणे मारणे, टोचून बोलणे यालाच अत्याचार म्हणत नाहीत. आजकाल प्रकर्षाने प्रत्येक नात्यात एकमेकांचा भावनिक छळ करण्याचे प्रमाण खूप वाढलेले दिसते. आजकालचे नाते संबंधच मुळात आपापले हेतू साध्य करून घेण्यासाठी निर्माण केले जातात. लग्न असो, फ्रेंडशिप असो, अनैतिक शारीरिक संबंध असोत, लिव्ह इन रिलेशनशिप असो, शारीरिक गरजा भागवण्यासाठी शोधलेला तात्पुरता जोडीदार असो अथवा व्यावसायिक संबंध असोत काहीतरी मिळवणे, स्वतःच्या पदरात जास्तीत जास्त फायदा पाडून घेणे यावर भर दिला जातो.

- Advertisement -

जोपर्यंत आपल्या हिशोबाने, आपल्या सोयीने आपल्याला कोणतीही झळ या संबंधामधून बसत नाही, समोरचा जोपर्यंत आपल्याला आडवा जात नाही, आपल्या कंट्रोलमध्ये असतो तोपर्यंत एकदम आनंदाने, हसतखेळत अशी नाती टिकतात किंबहुना टिकवली जातात. कधीतरी काहीतरी फायदा नक्की होईल या भाबड्या आशेतून ही नाती ताणली जातात. जेव्हा यातील एखादा स्वत:ची मतं, आवडनिवड, निर्णय, विचार, अपेक्षा, बंधन दुसर्‍यावर लादण्याचा प्रयत्न करतो तेव्हा अशी नाती डळमळीत होऊ लागतात. अनेकदा इच्छा असूनही अशा नात्यातून बाहेर पडणं सहजासहजी शक्य होत नाही.

आपण अशा नात्यांच्या धुंदीत इतके पुढे गेलेलो असतो की अनेक गोष्टी, अनेक चांगले खरंच जवळचे लोक आपल्यापासून दुरावलेले, दुखावलेले असतात. अशा वेळी ज्याच्यासाठी हे सर्व केले तोही जर आपल्या इच्छेनुसार वागत नसेल तर त्याची भावनिक पिळवणूक करून स्वतःच्या मतानुसार वागवणे सुरू केले जाते. जेव्हा सहजासहजी एखादी व्यक्ती आपल्या मनानुसार, मतानुसार वागत नाही तेव्हा त्याला आपल्या नात्याची, केलेल्या प्रेमाची, त्यागाची, मदतीची, सहकार्याची गळ घालून, त्याला भावनिक दबाव आणून, त्याची दिशाभूल करून, त्याला खोटी चुकीची माहिती पुरवून, खोटे आश्वासन देऊन, वचन देऊन, स्वतःचं खरं करून घेण्याची सवय लोकांना लागते.

- Advertisement -

अगदी साध्या साध्या छोट्या छोट्या गोष्टीवरून, सवयींवरून एकमेकांना त्रास देणे सुरू होते. घरातील नाती असोत, बाहेरील असोत, आपण बनवलेली नाती असोत अथवा आपल्यावर लादली गेलेली नाती असोत किंवा काळाच्या ओघात निर्माण झालेली नाती असोत, मिळणार्‍या चुकीच्या वागणुकीतून माणूस स्वत:ला खूप त्रास करून घेतो, त्रागा करतो, रडतो, कुढतो, हतबल होतो. स्वत:ला सतत समजावतो, स्वत:ला फसवतो, स्वत:च्या मनाची खोटी समजूत काढतो आणि अधिक अधिक फसत जातो, गुंतत जातो. आता आयुष्यात आहे तेच पुढे रेटण्याशिवाय काहीच पर्याय नाही असं समजून अजून भावनिक होतो आणि इथेच तो चुकतो.

अशा गोष्टी जास्त करून आपण स्वत: तयार केलेल्या, शाश्वत नसलेल्या, आधार नसलेल्या नात्यामध्ये जास्त घडताना दिसतात. कारण अशा नात्यांना कोठेही सुरक्षित असण्याची हमी नसते, ते शेवटपर्यंत टिकतील याची कोणतीही ग्वाही नसते किंवा या नात्यांना टिकवून ठेवण्यासाठी कोणीही जबाबदार नसते. भावना मन मोकळं करण्याच्या नादात आपण आपली सर्व माहिती विश्वासाने ज्याला सांगितलेली असते, तोच आपली पोच ओळखून आपल्याला मनस्ताप देण्यात अग्रेसर असतो.

आपल्याला फक्त आणि फक्त बरं वाटत राहावं, आपल्याला आयुष्यात कोणीतरी आहे, आपल्याला साथ द्यायला, सुखदुःख वाटून घ्यायला, समजावून घ्यायला, आयुष्यातील इतर समस्या बोलायला कोणीतरी असावे, एकटेपणा घालवायला, आपली स्वप्न पूर्ण करायला मिळेल तो, मिळेल तसा व्यक्ती आपण जवळ करून बसतो. पराकोटीच्या अविचाराने, पुढील कोणताही विचार न करता अशी नाती जमलेली असतात. हीच नाती जेव्हा डोईजड होऊ लागतात, आपल्या डोक्यावर बसू लागतात तेव्हा एकमेकांवर भावनिक अत्याचार करायला सुरुवात केली जाते. आपल्या आयुष्यातील वेदना कमी करण्यासाठी पेन किलर म्हणून तयार केलेली नातीच आपल्याला आयुष्यातून उठवायला कारणीभूत ठरतात तेव्हा लक्षात येते की आपण केवळ दुसर्‍याच्या तालावर नाचण्यात आपल्या आयुष्यातील किती बहुमोल वेळ, श्रम आणि पैसा वाया घालवला आहे.

भावनिक छळ करून समोरच्याने आपला किती गैरफायदा घेतला आहे हे समजेपर्यंत आपले खूप नुकसान झालेले असते. याची छोटी छोटी उदाहरणे म्हणजे मुद्दाम समोरील व्यक्तीने आपल्याला न आवडणारा, आपल्याला दुखावणारा स्टेटस व्हॉट्सअ‍ॅपला ठेवणे, मुद्दाम आपण डिस्टर्ब होऊ अशा पोस्ट टाकणं इथपासून ते आपला फोन न घेणे, आपल्या मेसेजला उत्तर न देणे, आपल्याला जे आवडत नाही तेच करणे, आपण हर्ट होऊ अशा पद्धतीने सतत वागत राहणे, जाणूनबुजून आपल्याला टाळणे, दुर्लक्ष करणे, सतत अपमानित करणे, आपल्याकडून इच्छा नसतानाही काही गोष्टी करून घेणे, करायला भाग पाडणे, आपल्या भावनांशी खेळणे, आपल्या सुख दुःखावर नेहमी दुसर्‍याचा कंट्रोल असणे, आपल्याला सतत चुकीचं खोटं ठरवण्याचा प्रयत्न करणे, आपली बदनामी करणे, आपल्याबद्दल अपमानास्पद शब्द वापरणे, आपल्यापासून अनेकदा अनेक गोष्टी लपवून ठेवणे, आपलं मन वळवायला सतत खोट्याचा आधार घेणे अशा प्रकारची वागणूक आपल्यावर इमोशनल अत्याचार करताना दिली जाते.

प्रेमाच्या, आपलेपणाच्या नावाखाली सतत संशय घेतं राहणे, उलट तपासणी घेणे, सारखी बंधनं घालत राहणे, सतत एखाद्याच्या वीक पॉईंटला आपल्या फायद्यासाठी वापरणे, सतत समोरील व्यक्तीला स्वत:चे समर्थन द्यावे लागेल यासारखी परिस्थिती निर्माण करणे, अबोला धरणे, सातत्याने एखाद्याला धाकात ठेवणे, आपल्या नजरेच्या इशार्‍यावर नाचवणे, दडपशाही, हुकूमशाही करून आपला अट्टाहास पूर्ण करून घेणे, समोरच्याचे बोलणे, मत, विचार याला शून्य किंमत देणे यांसारख्या गोष्टी करून अनेक जण इतरांवर भावनिक अत्याचार करून स्वतःचं आयुष्य स्वच्छंदीपणे जगत असतात.

समोरील व्यक्ती आपल्या वागणुकीमुळे, सवयीमुळे, आपल्या निर्णयामुळे किती त्रस्त होत आहे, त्याची काय घालमेल होत आहे आणि निव्वळ आपल्यावरील प्रेमामुळे, आपल्यासोबतचं नातं जपण्यासाठी तो किती कसरत करीत आहे, आपली मनधरणी करण्यासाठी तो किती लाचार होत आहे, आपलं मन जिंकण्यासाठी समोरील व्यक्ती किती तडजोड करीत आहे, आपले शब्द झेलताना समोरच्याची किती दमछाक होत आहे हे अनेकांच्या गावीही नसते.

त्यामुळे आपण केवळ एखादं नातं टिकवण्यासाठी कोणाच्या इमोशनल अत्याचाराचे शिकार होत नाही ना? हे वेळोवेळी तपासून बघा. नात्याची गरज दोघांना समान असली पाहिजे. दोन्ही बाजूने निःस्वार्थ बांधिलकी, तळमळ, नात्याचा आदर, आपलेपणा असेल तर आणि तरच कोणत्याही नात्यात पुढे जाण्यात अर्थ असतो. नाती मग ती रक्ताची असोत, बनलेली असोत वा बनवलेली असोत, आपल्याला आपल्या मजबुरीचा, आपल्या भावनांचा, आपल्या चांगल्या वृत्तीचा गैरफायदा घेऊन जर कोणी गृहीत धरत असेल तर वेळीच सावध होणे आवश्यक आहे.

दरवेळी हृदयाने, मनाने विचार करण्यापेक्षा डोक्याने, प्रॅक्टिकल विचार करून लवकरात लवकर सत्य स्वीकारून, स्वत:ची फसवणूक न करता अशा पोकळ कमकुवत नात्यातून बाहेर पडण्याची, नाही म्हणण्याची, योग्य वेळी योग्य निर्णय घेण्याची तयारी ठेवणे अत्यंत आवश्यक आहे. अशा भावनिक छळाला बळी पडत राहणे म्हणजेच स्वत:ला संपवत राहणे, स्वत:चं अस्तित्व पणाला लावणे आहे हे योग्य वेळी ओळखून अशा परिस्थितीमधून बाहेर पडावे.

-(लेखिका समुपदेशक आहेत)

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -