बीड जिल्ह्यामध्ये दोन शेतकऱ्यांनी एकाच दिवशी आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. महाशिवरात्रीच्या दिवशी आत्महत्या केल्यामुळे जिल्ह्यामध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे. ३५ वर्षाचे महादेव भोसले आणि ४५ वर्षाचे दामू शिंदे अशी या अत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांची नावे आहेत. सततची नापिकी आणि कर्जबाजारीपणाला कंटाळून या शेतकऱ्यांनी आत्महत्या केली असल्याचे समोर आले आहे.
गळफास लावून आत्महत्या
बीड जिल्ह्यातील खर्डेवाडी इथे राहणाऱ्या महादेव रामभाऊ भोसले या तरुण शेतकऱ्याने गळफास लावून आत्महत्या केली. या तरुण शेतकऱ्याने सततची नापिकी आणि कर्जबाजारीपणाला कंटाळून आत्महत्या केली आहे. संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी त्यांच्यावर होती. मात्र शेतातून काहीच उत्पन्न येत नसल्यामुळे कुटुंबाचा गाडा चालवणे त्यांना कठिण झाले होते. शेवटी त्यांनी आत्महत्याचा मार्ग स्विकारला. त्यांनी गळफास लावून आपली जीवनयात्रा संपवली. त्यांच्या पाश्चात त्यांची पत्नी, दोन लहान मुलं असा परिवार आहे. त्यांच्या निधनामुळे त्यांच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.
कर्जबाजारीपणाला कंटाळून आत्महत्या
तर, बीड जिल्ह्यातल्या वडवणी तालुक्यातील पिंपरखेडा येथे दुसऱ्या शेतकऱ्याने आत्महत्या केली आहे. दामू शिंदे असं या शेतकऱ्याचे नाव असून ते ४५ वर्षाचे होते. त्यांनी देखील गळफास लावून आत्महत्या केली आहे. त्यांनी देखील सततची नापिकी आणि कर्जबाजारीपणाला कंटाळून आत्महत्या केली आहे. त्यांच्या जाण्याने त्यांच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. एकाच दिवशी दोन तरुण शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्यामुळे बीड जिल्ह्यात हळहळ व्यक्त केली जात आहे.
हेही वाचा –